डोंबिवलीत बारसमोर चाकूचे सपासप वार; खुनानंतर फरार झालेले 6 आरोपी नाशिकमधून अटक
डोंबिवलीत बारसमोर चाकूचे सपासप वार; खुनानंतर फरार झालेले 6 आरोपी नाशिकमधून अटक
डोंबिवली एमआयडीसीतील बारसमोर ‘धक्का लागल्याच्या’ किरकोळ कारणावरून 38 वर्षीय आकाश सिंग यांची टोळक्याने चाकूने हत्या केली. घटनेनंतर फरार झालेल्या सहा आरोपींना मानपाडा पोलिसांनी नाशिकमधून जेरबंद केले आहे.
सायली मेमाणे
१२ नोव्हेंबर २०२५ : डोंबिवली – किरकोळ वादातून उद्भवलेल्या एका निर्घृण हत्येच्या घटनेने डोंबिवली हादरली आहे. एमआयडीसी फेज 2 मधील ‘मालवण किनारा’ बार आणि रेस्टॉरंटमध्ये ‘धक्का लागल्याच्या’ कारणावरून झालेल्या वादानंतर एका 38 वर्षीय तरुणाची टोळक्याने चाकूने हत्या केली. ही धक्कादायक घटना 9 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडली. या घटनेनंतर फरार झालेल्या सहा आरोपींना मानपाडा पोलिसांनी नाशिकमधून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश भानू सिंग (वय 38, राहणार गोग्रासवाडी) हे आपल्या मित्रांसह ‘मालवण किनारा’ या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. हॉटेलच्या प्रवेशद्वारावर एका अनोळखी व्यक्तीला चुकून धक्का लागला. हा धक्का हेतुपुरस्सर मारल्याचा गैरसमज करून त्या अनोळखी व्यक्तीने आकाश सिंग यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
आकाश आणि त्यांच्या मित्रांनी “धक्का चुकून लागला आहे” असे समजावण्याचा प्रयत्न केला, पण आरोपी शांत झाला नाही. उलट त्याने शिवीगाळ करत आकाशला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि काही वेळातच आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले. काही मिनिटांतच सहा जणांचं टोळकं तिथे दाखल झालं आणि परिस्थिती हिंसक वळणावर गेली.
टोळक्याने आकाश सिंग यांना हॉटेलमधून खेचून बाहेर आणले आणि सार्वजनिक रस्त्यावर त्यांच्यावर हल्ला केला. सुरुवातीला त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर चाकूने सपासप वार करून त्यांचा जागीच खून करण्यात आला. आकाश सिंग यांना वाचवण्यासाठी सुनील कागले यांनी हस्तक्षेप केला, मात्र टोळक्याने त्यांच्यावरही चाकूने वार केले. ते गंभीर जखमी झाले असून सध्या उपचाराधीन आहेत.
ही घटना घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. मृत आकाश सिंग यांचा भाऊ बादल सिंग यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात खुनाची तक्रार दाखल केली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी अतुल झेंडे (उपायुक्त) आणि सहाय्यक आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला.
सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. मानपाडा पोलिस स्टेशनचे अधिकारी संपत फडोळ आणि त्यांच्या पथकाने अथक प्रयत्न करून आरोपींना नाशिकमधून पकडले. या कारवाईत पोलिसांनी मोठी शिताफी आणि तत्परता दाखवली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- अमर महाजन
- अक्षयकुमार शंकर वागळे
- अतुल कांबळे
- निलेश ठोसर
- प्रतिकसिंग चौहान
- लोकेश चौधरी
या सर्व आरोपींना पोलिसांनी डोंबिवलीत आणले असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमागील नेमका हेतू आणि आरोपींच्या पार्श्वभूमीचा तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत हे सर्व आरोपी स्थानिक गुन्हेगारी टोळीशी संबंधित असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या घटनेने डोंबिवली परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. एका किरकोळ कारणावरून एका तरुणाचा जीव जाणं हे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं करतंय. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या तत्पर कारवाईचं कौतुक केलं असून, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.
पोलिसांचा तपास सुरू असून, आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिस कोठडी मिळवून पुढील चौकशी होणार आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा ‘बार हिंसा’ आणि तरुणांमधील टोळीयुक्त संघर्षाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.