पावसात ‘हे’ 5 प्रकारचे चहा प्या आणि अनुभव घ्या द्विगुणीत आनंद
पावसाळ्यात चहा पिण्याची मजा काही औरच असते!
पावसाळ्यात चहा पिण्याची मजा काही औरच असते! जाणून घ्या हे 5 वेगवेगळ्या प्रकारचे चहा जे तुमचा पावसाळा खास बनवतील.
सायली मेमाणे
पुणे 30 जून २०२५ : चहा आणि पावसाचा संगम म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव. कडक पावसात एखाद्या टपरीवर गरमागरम चहा हातात घेऊन थेंबांचा आवाज ऐकत प्यायचा आनंद शब्दांत मांडणं कठीणच. भारतातील चहाप्रेमींना ही मजा चांगलीच माहीत आहे. पावसाळ्यात हवामान आल्हाददायक असते, आणि याच वातावरणात चहा पिण्याचा अनुभव अजूनच खास होतो. आज आपण अशाच पाच विशेष प्रकारच्या चहांबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुमच्या पावसाच्या सरीत ‘ताजेपणा’ आणि ‘रुचकरता’ भरून टाकतील.
भारतात चहाची अनेक प्रकारची रूपं पाहायला मिळतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये चहा बनवण्याची पद्धत, त्यात घातले जाणारे मसाले, सादरीकरण आणि चव यामध्ये विविधता असते. यामुळेच भारतात चहाची एक खास संस्कृती विकसित झाली आहे.
सर्वात आधी बोलूया मसाला चहाबद्दल. पावसात सर्वाधिक लोकप्रिय असणारा हा चहा आद्रतेतही उर्जा देतो. आलं, लवंग, दालचिनी, मिरे अशा सुगंधी मसाल्यांपासून बनवलेला हा चहा शरीराला उब देतो आणि थंडीपासून संरक्षण करतो. रस्त्याच्या कडेला टपरीवर मसाला चहा प्यायचा आनंद काही औरच!
यानंतर तंदुरी चहाची बारी. कुल्हडमध्ये मिळणारा हा चहा मातीच्या भाजलेल्या भांड्यांमुळे एक वेगळी धुरकट चव आणि सुगंध देतो. विशेषतः जेव्हा गरम चहा अशा तंदुरात ओतला जातो, तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या वाफेचा अनुभव मनाला समाधान देणारा असतो.
तिसरा प्रकार म्हणजे इराणी चहा. पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये प्रसिद्ध असलेला हा चहा खूपच मऊ, क्रिमी आणि खास असतो. त्याच्यासोबत दिली जाणारी पाव किंवा बिस्किटं हा अनुभव अजूनही खुलवतात.
पुढे बोलूया काश्मिरी कहवा चहाबद्दल. केशर, बदाम, अक्रोड, लवंग आणि दालचिनी यांसारख्या पौष्टिक घटकांनी बनवलेला हा चहा फक्त स्वादिष्टच नाही, तर आरोग्यासाठी देखील लाभदायक आहे. थंड हवामानात शरीराला उब देणारा हा चहा विशेषतः परदेशी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.
पाचवा आणि विशेष चहा म्हणजे काश्मिरी नून चहा. याला गुलाबी चहा असंही म्हटलं जातं. क्षारीय घटक आणि दुधाच्या एकत्रिकरणातून बनवलेला हा चहा इतर चहांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्याचा स्वाद थोडा खारट असतो आणि रंग गुलाबी. तुम्ही तो पहिल्यांदा पाहिल्यावर शेक समजाल, पण प्यायल्यानंतर त्याची चव तुमच्या लक्षात राहील.
या सर्व प्रकारांचे चहा म्हणजे फक्त चहा नसून, ते भारताच्या विविध संस्कृतींचे आणि चहाप्रेमाच्या प्रवासाचे प्रतीक आहेत. पावसाळ्यात तुम्ही यापैकी एक तरी चहा अनुभवला नाही, तर समजा काहीतरी मिस केलं. यंदा पावसाळ्यात घरात किंवा बाहेर कुठेही, पण ‘चहाच्या कपात’ आनंद शोधा.