पुण्यात जोडप्याची क्रूरता! तान्हुल्याला सोडून फरार, पोलिसांचा तपास उघडकीस आणतो धक्कादायक सत्य
पुण्यात नवजात बाळाला उड्डाणपुलाखाली टाकले! आई-वडीलांना पोलिसांची अटक
पुण्यात सांगवी येथे 5 दिवसांच्या बाळाला उड्डाणपुलाखाली टाकून दिल्याप्रकरणी प्रतीक व समीधा तुपे या जोडप्याला पोलिसांनी अटक केली आहे. ‘बाळ माझं नाही’ या संशयावरून त्यांनी हे कृत्य केलं.
सायली मेमाणे
पुणे १ ऑगस्ट २०२५ : पुणे : पुण्यातील सांगवी परिसरात एक धक्कादायक आणि काळजाला भिडणारी घटना उघडकीस आली आहे. एका पाच दिवसांच्या नवजात बालकाला उड्डाणपुलाखाली निर्जन स्थळी सोडून दिल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित माता-पित्याला अटक केली आहे. आरोपी प्रतीक तुपे (वय 24) आणि समीधा तुपे (वय 27) हे दोघेही कामशेत येथील रहिवासी असून त्यांनी या बालकाला 18 जुलै रोजी कासारवाडी उड्डाणपुलाखाली सोडून दिलं होतं. या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून पुणे पोलिसांनी या घटनेचा तपास करत असंख्य अडचणींवर मात करून आरोपींना तातडीने जेरबंद केलं.
या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी वडिलांनी ‘हे बाळ माझं नाही’ असा संशय व्यक्त केला होता. यामुळेच त्यांनी नवजात बालकास स्वीकारण्यास नकार दिला आणि पत्नीवर दबाव टाकून बालकाला सार्वजनिक ठिकाणी टाकून देण्याचा निर्णय घेतला. पोलिस तपासातून समोर आलं की समीधा हिला पहिल्या पतीपासूनही एक मुलगा आहे. ती पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर प्रतीकसोबत राहत होती आणि त्यांचं एक अपत्य देखील होतं. या नंतर तिसरं बाळ झाल्यानंतर प्रतीकने त्याचं पितृत्व नाकारलं आणि हा अमानुष निर्णय घेण्यात आला.
बालकाच्या शोधासाठी सांगवी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. एक पुरुष आणि महिला बाळाला दुचाकीवरून येऊन त्या ठिकाणी सोडून जात असल्याचं दिसलं. मात्र सीसीटीव्हीत गाडीचा नंबर स्पष्ट न दिसल्याने तपासात अडथळे आले. परिसरातील इतर सीसीटीव्ही बंद अवस्थेत असल्यानेही पोलिसांना शोधकार्यात अडचणी आल्या. तरीदेखील सांगवीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चक्रधर ताकभाते, महादेव भालेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कसून तपास करून दोन्ही आरोपींना त्यांच्या कामशेत येथील राहत्या घरातून अटक केली.
ही घटना सामाजिक मानसिकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. मुलं ही कोणत्याही परिस्थितीत निरपराध असतात. मात्र इथे आई-वडीलच त्यांच्या मुलाला जिवंतपणी मृत्यूच्या दाढेत ढकलत आहेत, हे पाहून समाजमन सुन्न होतं आहे. पोलिसांनी वेळेवर केलेल्या कारवाईमुळे या बालकाच्या जिवाला धोका टळला असला तरी आरोपींवर कठोर कारवाई होणं अत्यावश्यक आहे.
दरम्यान, दुसरीकडे नागपूरमधून देखील पोलिस दलाला कलंकित करणारी एक घटना समोर आली आहे. कळमना पोलिस ठाण्यातील चार पोलिस कर्मचारी विद्यार्थ्यांकडून खंडणी घेतल्याच्या प्रकरणात बडतर्फ करण्यात आले असून एका पोलिस कर्मचाऱ्याला तरुणीचं अपहरण केल्याच्या प्रकरणात निलंबित करण्यात आलं आहे. या घटना दाखवतात की कायद्याचे रक्षकच जर नियम तोडत असतील, तर सामान्य जनतेचा विश्वास कुणावर राहील?
पुण्यातील सांगवीतील नवजात बालक प्रकरण हे सामाजिक, कौटुंबिक आणि नैतिकतेच्या सर्वच स्तरांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे. पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि शिताफीने केलेली अटक ही कौतुकास्पद असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई होणं हीच न्यायाची अपेक्षा आहे.