मुंबईचा होणार कायापालट! वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू तीन वर्षांत पूर्ण; अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती
मुंबईचा होणार कायापालट! वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू तीन वर्षांत पूर्ण; अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती
इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल-एस्टेट कॉन्क्लेव्ह 2025 मध्ये भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितले की वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण होईल. ‘मुंबई वन’ अॅपमध्ये सागरी वाहतूकही जोडली जाणार.
सायली मेमाणे
पुणे ११ ऑक्टोबर २०२५ : मुंबईचा कायापालट होण्याची घडी आता जवळ येत आहे. अमित साटम यांनी सांगितले की, 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशातील विकास कामांना मोठी गती मिळाली. मुंबईत कोस्टल रोड, मेट्रो, आणि सागरी सेतूसारख्या मोठ्या प्रकल्पांना चालना मिळाली. त्यांनी सांगितले की, 1999 ते 2014 या कालावधीत फक्त वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर एकच मेट्रो धावत होती, परंतु 2014 ते 2025 या काळात तब्बल 356 किलोमीटर मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. हे काम पूर्ण झाल्यावर मुंबईकरांच्या प्रवासात मोठा बदल होईल.
मुंबईचा विकास आतापर्यंत दक्षिण मुंबई, अंधेरी, ठाणे आणि नवी मुंबई या भागांपुरता मर्यादित होता. परंतु आता हा विकास महामुंबई क्षेत्रातील नव्या केंद्रांपर्यंत नेण्यात येणार असल्याचे साटम यांनी सांगितले. त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच लाँच केलेल्या ‘मुंबई वन’ अॅपचाही उल्लेख केला. या अॅपमुळे मुंबईतील प्रवाशांना एकाच ठिकाणी मेट्रो, मोनोरेल, लोकल ट्रेन, बस आणि टॅक्सीची तिकिटे खरेदी करता येतील. एकाच क्यूआर कोडवर संपूर्ण मल्टी-मॉडल प्रवास शक्य होणार आहे. या अॅपमध्ये 11 वेगवेगळ्या वाहतूक प्राधिकरणांचा समावेश आहे आणि लवकरच सागरी वाहतूकही यात जोडली जाणार आहे.
या कॉन्क्लेव्हमध्ये मुंबईतील सर्वात चर्चेतील प्रकल्प — वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू — याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा सागरी मार्ग उभारला जात आहे. हा सेतू एकूण 17 किलोमीटर लांबीचा असून, त्याचे मुख्य सागरी बांधकाम 9.60 किलोमीटर लांबीचे आहे. हा पूल समुद्रात तब्बल 900 मीटर आतमध्ये उभारला जाणार आहे. 2018 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, पुढील तीन वर्षांत म्हणजेच 2028 पर्यंत हा सागरी सेतू पूर्ण होईल, असे अमित साटम यांनी सांगितले.
वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू पूर्ण झाल्यानंतर पश्चिम उपनगरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात सुलभ होणार आहे. सध्या बँद्रा-वर्ली सी लिंकवर वाढत्या वाहतुकीचा ताण जाणवत आहे. नवीन सागरी मार्ग सुरू झाल्यानंतर प्रवाशांना वर्सोवा ते वांद्रे दरम्यानचा प्रवास केवळ काही मिनिटांत करता येईल. हा पूल मुंबईच्या किनारपट्टीवरील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलून टाकणार असल्याचे साटम यांनी नमूद केले.
मुंबईच्या विकास आराखड्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “आमचे उद्दिष्ट केवळ रस्ते आणि पूल बांधण्यापुरते मर्यादित नाही, तर मुंबईचा प्रवास आधुनिक, स्मार्ट आणि शाश्वत बनवणे आहे.” मुंबई वन अॅप, मेट्रो नेटवर्क, कोस्टल रोड आणि वर्सोवा-वांद्रे सी लिंक या प्रकल्पांमुळे मुंबईचा खऱ्या अर्थाने कायापालट होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.