मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला नवा थांबा; दौंड स्टेशनवर थांबणार वंदे भारत एक्सप्रेस
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला नवा थांबा; दौंड स्टेशनवर थांबणार वंदे भारत एक्सप्रेस
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आता प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड स्टेशनवरही थांबणार आहे. रेल्वे मंत्रालयाने प्रायोगिक तत्त्वावर हा निर्णय घेतला असून लवकरच या नवीन थांब्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
सायली मेमाणे
पुणे २७ ऑक्टोबर २०२५ : मुंबई ते सोलापूर या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला आता प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी एक नवा थांबा मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार, मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला दौंड स्थानकावर थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे. रेल्वे मंडळाचे संयुक्त संचालक विवेक कुमार सिन्हा यांच्या सहीनिशी हा आदेश जारी करण्यात आला असून 30 सप्टेंबर रोजी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून लवकरच प्रवाशांना या नव्या थांब्याचा लाभ मिळणार आहे.
या निर्णयानंतर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः पुणे व सोलापूरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा थांबा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. दौंड हे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असल्याने, येथून पुणे, अहमदनगर, नाशिक आणि विदर्भाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसचा दौंड येथे थांबा हा प्रवाशांसाठी अतिशय सोयीस्कर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मध्य रेल्वेच्या आदेशानुसार, केवळ मुंबई-सोलापूर वंदे भारतच नव्हे तर हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेसलाही नवीन थांबा मिळणार आहे. हुबळी-पुणे वंदे भारत (ट्रेन क्रमांक 20669/20670) ला किर्लोस्करवाडी येथे थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा दोन्ही बदल प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आला असून प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास तो कायमस्वरूपी केला जाईल.
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ही CSMT स्थानकातून संध्याकाळी 4 वाजून 5 मिनिटांनी सुटते. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, पुणे आणि आता दौंड अशा ठिकाणी थांबा देण्यात आला आहे. सध्या ही गाडी पुण्यात संध्याकाळी 7.10 वाजता पोहोचते, तर सोलापूरला रात्री 10.40 वाजता पोहोचते. परतीच्या प्रवासात म्हणजेच सोलापूर-CSMT वंदे भारत सकाळी 6.05 वाजता सुटते आणि कुर्डुवाडी, पुणे, कल्याण, ठाणे, दादर या स्थानकांवर थांबत दुपारी 12.35 वाजता मुंबईत पोहोचते.
वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील अत्याधुनिक, सेमी-हायस्पीड ट्रेन असून ती प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देते. मुंबई-सोलापूर मार्गावर ही ट्रेन सुरू झाल्यापासून प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता दौंड येथे थांबा मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांनाही या आधुनिक सेवेतून फायदा होणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांच्या मागण्यांचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाचा उद्देश प्रवास अधिक सोयीस्कर आणि किफायतशीर करणे हा असून, भविष्यात आणखी काही वंदे भारत गाड्यांना नवीन थांबे देण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने या संदर्भातील अंतिम नियोजन पूर्ण केले असून काही दिवसांतच दौंड थांबा लागू होईल अशी अपेक्षा आहे.
या नव्या बदलामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी रेल्वे प्रवासाचा अनुभव आणखी सुकर होईल. वंदे भारतसारख्या आधुनिक ट्रेनला अधिक स्थानिक जोड मिळाल्यास ग्रामीण आणि शहरी भागातील रेल्वे संपर्क आणखी बळकट होईल, अशी सर्वसामान्य प्रवाशांची भावना व्यक्त होत आहे.