युतीचे निर्णय स्थानिक पातळीवरच; दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल – देवेंद्र फडणवीस
युतीचे निर्णय स्थानिक पातळीवरच; दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल – देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की स्थानिक पातळीवरील निवडणुकांसाठी युतीचे निर्णय जिल्ह्यांतच होत असून परवा पर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. जागावाटप राज्यस्तरावर होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सायली मेमाणे
पुणे १७ नोव्हेंबर २०२५ : राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीतील पक्षांमध्ये कोणत्या ठिकाणी एकत्र लढायचे आणि कोणत्या ठिकाणी स्वतंत्रपणे लढायचे, याबाबत अनेक तर्क-वितर्कांना ऊत आला होता. मात्र या सर्वांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की स्थानिक पातळीवरील युतीचे निर्णय तेथील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यांमध्येच घेतले जात आहेत. त्यामुळे आगामी दोन दिवसांत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.
फडणवीस म्हणाले की, “या छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. ही राज्यभरातली मोठी निवडणूक नाही. त्यामुळे जागावाटप किंवा युतीबाबतचे निर्णय आम्ही राज्यस्तरावर करत नाही. जागावाटप जिल्ह्यांतच ठरते आणि तेथील नेते, कार्यकर्ते आणि पक्षांमधील स्थानिक समन्वय यावर संपूर्ण प्रक्रिया अवलंबून असते.”
त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले की काही जिल्ह्यांमध्ये दोन पक्षांची युती झाली आहे, तर काही ठिकाणी कोणत्याही पक्षांमध्ये युती झालेली नाही. स्थानिक पातळीवरील नेतृत्त्वाने परिस्थितीचे मूल्यांकन करून शक्य तिथे युती करून घेतली आहे. तर काही ठिकाणी प्रत्येक पक्षाने ताकद आजमावण्यासाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक परिस्थिती, मतदारसंघांची सामाजिक रचना आणि संभाव्य उमेदवारांची ताकद यांचा विचार करून युतीचे गणित निश्चित करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्याकाही दिवसांपासून विशेषतः ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागात कोणत्या पक्षाची कोणाशी युती होणार याबाबत अनेक चर्चांना ऊत आला होता. शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, काँग्रेस आणि मनसे अशा विविध पक्षांमध्ये युतीसाठी चर्चांची मालिका सुरू असल्याची माहिती समोर येत होती. मात्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर स्पष्ट झाले की राज्य स्तरावर एकसंध धोरण न आखता प्रत्येक जिल्ह्याला त्यांच्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे.
ते पुढे म्हणाले की, “स्थानिक निवडणुकांत स्थानिक मुद्यांना जास्त महत्त्व असते. त्यामुळे कोणाशी युती करायची आणि कोणत्या पक्षासोबत लढायचे याचे निर्णय देखील त्या-त्या नगरपरिषद किंवा नगरपंचायत क्षेत्रातील वास्तवावर आधारित घेतले जातात. परवापर्यंत सर्वत्र चित्र स्पष्ट होईल.”
स्थानिक पदाधिकारी आणि इच्छुक कार्यकर्त्यांच्या दृष्टीनेही हे निर्णय अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. अनेक ठिकाणी उमेदवारी आणि युतीच्या शक्यतांवर अवलंबून पक्षांतर्गत स्पर्धा वाढलेली दिसत आहे. काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढण्याचा हट्ट, तर काही ठिकाणी महायुतीचे समीकरण मजबूत करण्याचा प्रयत्न अशा दोन्ही गोष्टींचा मिलाफ पाहायला मिळत आहे.
फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय चर्चांना दिशा मिळाली असून पुढील दोन दिवसांत कोणत्या नगरपरिषदांमध्ये आणि नगरपंचायतीत कोणत्या पद्धतीने महायुती उभी राहणार याची उत्सुकता वाढली आहे.