संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य; भीम आर्मीचा संताप, एन्काऊंटरची मागणी
संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य; भीम आर्मीचा संताप, एन्काऊंटरची मागणी
‘सर्वधर्म समभाव’ संकल्पनेवर टीका करत संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. भीम आर्मीने त्यांच्या वक्तव्यावर तीव्र निषेध करून एन्काऊंटरची मागणी केली आहे.
सायली मेमाणे
पुणे ६ ऑगस्ट २०२५ : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना भिडे यांनी ‘सर्वधर्म समभाव’ या संकल्पनेवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, “सर्वधर्म समभाव हा निखळ ना पुरुष ना स्त्री असा प्रकार म्हणजे नपुंसक. मी पती तू पत्नी हे उलट पाहिजे हे शक्य आहे का? तर नाही. म्हणून सर्वधर्म समभाव हा नीचपणा आहे.” या वक्तव्यावरून सर्वत्र संताप व्यक्त होत असून सामाजिक माध्यमांवरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
या विधानानंतर भीम आर्मीनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत म्हटले की, “संविधान, तिरंगा आणि सामाजिक सलोखा यांचा विरोध करणाऱ्या मनोहर भिडेंचा एन्काऊंटर सरकारने केला पाहिजे.” त्यांनी सरकारला इशारा दिला की जर लवकरात लवकर कारवाई केली नाही, तर जनता भिडेंच्या तोंडाला काळे फासेल.
संभाजी भिडे यांचे हे वादग्रस्त विधान हे त्यांच्या जुन्या वादातीत वक्तव्यांच्या मालिकेतले आणखी एक उदाहरण ठरले आहे. याच कार्यक्रमात त्यांनी जुन्या “आंबा खाल्ल्याने मुलगा होतो” या विधानाचाही पुनरुच्चार केला. त्यांनी सांगितले की, “मी आंबा खाल्ल्याने मूल होतात असं सांगितलं होतं, आणि आजही मी आंब्याचं झाड लावलं आहे, जिथे तुम्ही जाऊन आंबे खाऊ शकता.” त्यांच्या या वक्तव्यावर यापूर्वीही खटला दाखल आहे.
तसेच त्यांनी 15 ऑगस्टला तिरंगा फडकवण्याचा सन्मान राखत, भविष्यात लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्याचे स्वप्नही बोलून दाखवले. त्यांच्या या विधानांनी सामाजिक व राजकीय वातावरणात पुन्हा एकदा तीव्र वादंग निर्माण झाला आहे. घटनेच्या मुल्यांवर आणि धार्मिक सौहार्दावर भाष्य करताना अशा प्रकारच्या वक्तव्यांवर कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर कठोर पाऊले उचलली जातील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.