सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर गुन्हे कायम, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश कायम
सर्वोच्च न्यायालयाने सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. विजयबाई सूर्यवंशी यांना मोठा दिलासा, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला समाधान.
सायली मेमाणे
पंढरपूर 30 जुलै २०२५ : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश कायम
पंढरपूर | सर्वोच्च न्यायालयाने सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 4 जुलै रोजी दिलेल्या निर्णयानुसार दोषी पोलिसांवर एका आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात संबंधित पोलिसांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी झालेल्या सुनावणीत हा आदेश कायम ठेवत पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले.
या निर्णयामुळे पीडित विजयबाई सूर्यवंशी यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या दीर्घ कायदेशीर लढ्याला अखेर यश मिळाल्याचे मानले जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या महत्त्वपूर्ण खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने विजयबाई सूर्यवंशी यांच्या बाजूने निकाल दिला आहे.”
प्रकरणाचा आढावा घेतला असता, सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिस कोठडीत झाला होता. या संदर्भात त्यांच्या मृत्यूला पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप करत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आणि त्यानुसार औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
या खटल्यात ॲड. प्रकाश आंबेडकर, ॲड. प्रतीक बोंबार्डे आणि ॲड. कीर्ती आनंद यांनी सूर्यवंशी कुटुंबियांची बाजू लढवत प्रभावी युक्तिवाद मांडला. ॲड. आंबेडकर यांनी या निकालावर समाधान व्यक्त करत सांगितले की, “हा निर्णय देशाच्या न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास अधिक दृढ करणारा आहे.”
सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय पोलिस अत्याचाराविरोधातील लढ्याला नवा दिशा देणारा ठरत असून, पीडित कुटुंबियांसाठी तो न्यायाचा विजय मानला जात आहे.