Women’s World Cup 2025: मिताली राज आणि रवी कल्पना यांचा विशाखापट्टणममध्ये विशेष सन्मान
मिताली राज आणि रवी कल्पना यांचा विशाखापट्टणममध्ये विशेष सन्मान
ICC महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 च्या IND vs AUS सामन्याआधी, विशाखापट्टणमच्या ACA-VDCA स्टेडियममध्ये मिताली राज आणि रवी कल्पना यांच्या नावावर स्टँडचे अनावरण होणार, महिला क्रिकेटमध्ये त्यांच्या योगदानाचा सन्मान.
सायली मेमाणे
पुणे ८ ऑक्टोबर २०२५ : १२ ऑक्टोबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला एकदिवसीय विश्वचषक सामना होणार आहे. सामन्यापूर्वी विशाखापट्टणममधील ACA-VDCA स्टेडियममध्ये दोन दिग्गज महिला क्रिकेटपटूंचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनने भारतीय महिला संघाच्या माजी खेळाडू मिताली राज आणि रवी कल्पना यांच्या नावावर स्टँड ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा स्टँड IND vs AUS सामन्यापूर्वी अनावरण करण्यात येणार आहे.
या निर्णयामागे विशेष कारण आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या “ब्रेकिंग द बाउंड्रीज” कार्यक्रमादरम्यान, भारतीय सलामीवीर स्मृती मानधनाने आंध्र प्रदेशच्या आयटी मंत्री नारा लोकेश यांना महिला क्रिकेट दिग्गजांना सन्मान मिळावा अशी सूचना दिली होती. मंत्री नारा लोकेश यांनी या सूचनेला गांभीर्याने घेऊन ती तत्काळ अंमलात आणली आहे.
आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या निवेदनात म्हटले आहे की, मिताली राज आणि रवी कल्पना यांचा सन्मान करणे हे महिला क्रिकेटमधील त्यांच्या योगदानाचा आणि प्रेरणादायी भूमिकेचा आदर आहे. या सन्मानामुळे भावी पिढ्यांना मोठे स्वप्न पाहण्यास प्रोत्साहन मिळेल.
मंत्री नारा लोकेश यांनी स्मृती मानधनाच्या सूचनेचे कौतुक केले असून, ते म्हणाले की, हा निर्णय समाजाच्या विचारसरणीला प्रतिबिंबित करणारा असून लिंग समानता आणि महिला खेळाडूंच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करतो.
मिताली राज ही भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. २३ वर्षांच्या कारकिर्दीत तिने २३२ एकदिवसीय सामन्यांत ७८०५ धावा केल्या आहेत, ज्यात ७ शतके समाविष्ट आहेत. टी-२० मध्ये तिने ८९ सामन्यांत २३६४ धावा केल्या आहेत, तर १२ कसोटी सामन्यांत ६९९ धावा फटकावल्या आहेत. तिची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या २१४ आहे, जी भारतीय महिला फलंदाजांमध्ये सर्वोच्च आहे. मितालीने २०२२ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
रवी कल्पना २०१५-१६ दरम्यान भारताकडून सात एकदिवसीय सामने खेळली. ती आंध्र प्रदेशातील भारतीय जर्सी घालणारी पहिली महिला क्रिकेटपटू आहे. सामान्य पार्श्वभूमीतून पुढे आलेल्या रवीच्या संघर्षाने अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा दिली आहे. तिच्या प्रेरणेने अरुंधती रेड्डी, एस. मेघना आणि श्री चरणी यांसारख्या खेळाडूंनी भारतासाठी महत्वाचे सामन्यांमध्ये योगदान दिले आहे.
ACA च्या या निर्णयामुळे महिला क्रिकेटच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. स्टँडचे नाव देणे केवळ या खेळाडूंच्या कामगिरीचे स्मरण करणार नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.