एक गुंठ्यासाठी गोळीबार! जमीन वादातून बाप-लेकाचा तरुणावर हल्ला; पुरंदर तालुक्यात खळबळ
एक गुंठ्यासाठी गोळीबार! जमीन वादातून बाप-लेकाचा तरुणावर हल्ला; पुरंदर तालुक्यात खळबळ
पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी येथे एक गुंठा जमीन नावावर करून देण्यास नकार दिल्याने बाप-लेकाने तरुणावर गोळीबार केला. सासवड पोलिसांनी दोघांना अटक केली असून राज्यात वाढत्या गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पुणे ०७ जानेवारी २०२६ : राज्यासह देशभरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खून, हाणामाऱ्या, लुटमार, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर प्रकारांच्या बातम्या दररोज समोर येत आहेत. अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात घडली असून केवळ एक गुंठा जमिनीच्या वादातून तरुणावर थेट गोळीबार करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी येथे शुक्रवारी (दि. ६) पहाटे ही घटना घडली. विकी मुरली राजपूत (वय ३०) या तरुणाने सासवड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड (वय २७) आणि त्याचे वडील उत्तरसिंग रामकुमार राठोड (वय ५५, दोघे रा. भोसे, ता. खेड) यांनी हा हल्ला केला. आरोपींना सासवड पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.
फिर्यादी विकी राजपूत यांच्या नावावर चाकण आणि वाकड येथे प्रत्येकी एक गुंठा जमीन आहे. यापैकी एक गुंठा जमीन आपल्या नावावर करून देण्यासाठी आरोपी गेल्या काही काळापासून सातत्याने दबाव टाकत होते. मात्र फिर्यादीने स्पष्ट नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. ४ फेब्रुवारी रोजी फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
शुक्रवारी पहाटे आरोपी थेट फिर्यादीच्या घरी पोहोचले. दरवाजा उघडण्यास नकार दिल्यानंतर शिवीगाळ करत पिस्तुलातून दोन राऊंड फायर केल्याचा गंभीर आरोप आहे. गोळीबाराचा आवाज ऐकताच शेजारील नागरिक जागे झाले. नागरिकांची हालचाल वाढताच आरोपी चारचाकी वाहनातून घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच सासवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. भोर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर आणि पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे करत आहेत.
दरम्यान, राज्यात गुन्हेगारीचे दुसरे धक्कादायक चित्र जालन्यातून समोर आले आहे. जालना शहरातील मंगळ बाजार चौकासमोर भरदिवसा एका तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. शाहेद सगीर शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून आपापसातील वादातून एक ते दोन जणांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पुरंदरमधील गोळीबाराची घटना आणि जालन्यातील हत्या या दोन्ही घटना राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या आहेत. किरकोळ वाद, जमीन व्यवहार आणि वैयक्तिक संघर्षातून थेट प्राणघातक हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. पोलिसांकडून तत्काळ कारवाई होत असली तरी अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना आणि प्रभावी प्रतिबंधक यंत्रणा राबवण्याची गरज अधिक तीव्र होत चालली आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information