ठाणे : शहापूरमधील आरोग्य सेवांची प्रत्यक्ष पाहणी; आदिवासी आरोग्य समितीचा दौरा
आदिवासी आरोग्य अभ्यास समितीने नुकतीच तालुक्याला भेट दिली.
आदिवासी आरोग्य समितीने शहापूर तालुक्यातील अंगणवाड्यांना भेट देत पोषण व माता-शिशु आरोग्य सेवा कशा पोचत आहेत याचा आढावा घेतला.
सायली मेमाणे
२७ जून २०२५ : शहापूर तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये आरोग्य सुविधा पुरविण्यात येणाऱ्या अडथळ्यांची माहिती घेण्यासाठी आदिवासी आरोग्य अभ्यास समितीने नुकतीच तालुक्याला भेट दिली. जिल्ह्याच्या सर्वात दुर्गम भागांपैकी एक असलेल्या शहापूरमधील मुसईवाडी, बीट शेणवा व प्रकल्प शहापूर येथील अंगणवाडी केंद्रांमध्ये समितीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत तेथील नागरिकांशी संवाद साधला.
या दौऱ्यात प्रोजेक्ट ऑफिसर नरेश आकावरू (कळवण), पॉलिसी रिसर्चर हर्षाली घुले आणि ‘खुशी बेबी’ या संस्थेच्या इंटर्न ओविया शंकरन यांनी भाग घेतला होता. या पथकाने बालकांचे पोषण, पूर्वप्राथमिक शिक्षण व माता-शिशु संगोपनासंदर्भातील सेवा प्रत्यक्ष पाहण्यावर भर दिला. मुलांसोबत संवाद साधून त्यांची शैक्षणिक व पोषणात्मक स्थिती समजून घेतली, तर गरोदर व स्तनदा मातांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
अंगणवाडी सेविकेच्या मार्गदर्शनाने पोषण ट्रॅकर प्रणाली, ‘सॅम’ (Severely Acute Malnutrition) असलेल्या मुलांसाठी केले जाणारे उपाय, दिला जाणारा नियमित आहार व ‘अमृत आहार’ याविषयी माहिती घेतली. समिती सदस्यांनी अंगणवाडीत बनवलेला आहार चाखून त्याची गुणवत्ता व चव प्रत्यक्ष अनुभवली. तसेच, सेविका आणि मदतनीस यांच्याशी संवाद साधून विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीबाबतही सविस्तर चर्चा झाली.
शहापूर तालुक्यातील आरोग्य सेवा हे एक मोठे आव्हान असताना, अशा स्वरूपाची प्रत्यक्ष पाहणी व संवादाद्वारे आरोग्य व्यवस्थेची खरी परिस्थिती समोर येते. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह बालविकास प्रकल्प अधिकारी धनश्री साळुंखे यांची या दौऱ्यात उपस्थिती होती. समितीने यावेळी अंगणवाड्यांच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त केले व यापुढील धोरणात्मक सुधारणांसाठी सूचना नोंदवल्या.
या दौऱ्यातून हे स्पष्ट झाले की, दुर्गम भागांमध्ये पोषण व आरोग्य सेवांचे प्रभावी अंमलबजावणी करणे हे किती आवश्यक आहे. सरकारच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे की नाही, याची खातरजमा अशा पाहण्या करूनच करता येते. आरोग्य आणि पोषणाच्या मुद्द्यांवर अधिक फोकस ठेवून प्रशासनाने ग्रामीण भागातील यंत्रणेला अधिक बळकट करण्याचे धोरण हाती घेतले पाहिजे.