‘आता थेट मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीलाच येईन!’; पंतप्रधान मोदींचा बंगालमधून विजयाचा शंखनाद

‘आता थेट मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीलाच येईन!’; पंतप्रधान मोदींचा बंगालमधून विजयाचा शंखनाद
बॅरकपूर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आत्मविश्वासपूर्ण दावा; ४ मेनंतर भाजप सरकारच्या शपथविधीसाठीच बंगालमध्ये येईन.
पुणे २७ एप्रिल २०२६ : बॅरकपूर:पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा आता अंतिम टप्प्यात आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅरकपूर येथील सभेतून विजयाचा जबरदस्त आत्मविश्वास व्यक्त केला आहे. “बंगालमधील ही माझी शेवटची निवडणूक सभा आहे. आता मी ४ मे नंतर थेट भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यालाच उपस्थित राहण्यासाठी पुन्हा या भूमीवर पाय ठेवेन,” अशा शब्दांत मोदींनी तृणमूल काँग्रेसला आव्हान देत सत्तापरिवर्तनाचा दावा केला.
पंतप्रधानांनी यावेळी आपल्या भाषणात बंगालशी असलेल्या भावनिक नात्याला उजाळा दिला. “घराचा त्याग केल्यापासून देशातील जनताच माझे कुटुंब आहे. माझ्या वैयक्तिक आणि आध्यात्मिक प्रवासात बंगालच्या मातीचे योगदान अमूल्य आहे. येथील महान व्यक्तिमत्त्वांकडून मला प्रेरणा मिळाली, तर जनतेने मला अपार प्रेम दिले. या भूमीतून मिळालेले अनुभव माझ्या आयुष्याची शिदोरी आहेत,” असे भावूक उद्गार मोदींनी काढले.
निवडणूक प्रचारादरम्यान संपूर्ण बंगालचा दौरा केल्यानंतर आपला आत्मविश्वास द्विगुणित झाल्याचे मोदींनी नमूद केले. ते म्हणाले, “मी बंगालमध्ये जिथे जिथे गेलो, तिथे तिथल्या लोकांचा कल पाहिला आहे. इथल्या जनतेला आता बदल हवा आहे. याच आत्मविश्वासाच्या जोरावर मी आज या निवडणूक रणांगणाचा निरोप घेत आहे, की ४ मे नंतर येथे भाजपचेच सरकार स्थापन होईल आणि मी त्या सोहळ्याचा साक्षीदार होईन.”
आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून लोकांचे संदेश आणि पत्रे वाचत असल्याचा उल्लेखही मोदींनी केला. “मी रात्रभर जागून तुमचे संदेश वाचले आहेत. तुमच्या अनेक पत्रांमधून मला तुमचे दुःख आणि वेदना समजल्या आहेत. तुम्ही माझ्यावर किती मोठी जबाबदारी टाकली आहे आणि तुमच्या माझ्याकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, याची मला पूर्ण जाणीव आहे. तुमचे आशीर्वाद हीच माझी शक्ती आहे,” असे सांगत त्यांनी बंगालच्या जनतेला आश्वस्त केले.
पंतप्रधानांच्या या विधानामुळे बंगालमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. आता ४ मे च्या निकालानंतर बंगालमध्ये खरोखरच ‘कमळ’ फुलणार की ममता बॅनर्जी आपली सत्ता राखणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare