TMC ने २५ जुलै रोजी ठाण्यात पाणीकपात जाहीर केली आहे. घोडबंदर रोड, पाटलीपाडा, बाळकुमसह अनेक भागांमध्ये सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
सायली मेमाणे
पुणे २३ जुलै २०२५ : ठाणे शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना ठाणे महानगरपालिकेने जारी केली आहे. येत्या २५ जुलै रोजी ठाण्यातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना आधीच पाणी साठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही पाणीकपात जलवाहिन्यांच्या तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे करण्यात येत आहे.
ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, जय भवानी नगर पंप हाऊसमधील पंपाची तांत्रिक दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने शुक्रवारी, २५ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत संपूर्ण १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत ठाण्यातील घोडबंदर रोड, पाटलीपाडा, बाळकुम, ब्रह्मांड, पवार नगर, कोठारी कंपाउंड, डोंगरी पाडा, वाघबिल आणि आजूबाजूच्या परिसरात पाणी येणार नाही.
या निर्णयामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना काही काळ पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे ठाणेकरांनी या दिवशीसाठी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पालिकेच्या जलपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
या दुरुस्तीचे काम मूळत: मंगळवारी, २२ जुलै रोजी होणार होते. मात्र काही कारणांमुळे ते पुढे ढकलण्यात आले असून, आता २५ जुलै रोजीच हे काम पार पाडले जाणार आहे. या कामादरम्यान स्टेम प्राधिकरणही त्यांच्या जलवाहिनीवर शटडाऊन घेणार असल्याचे कळवण्यात आले आहे. त्यामुळे २४ तास ठाण्यातील काही भाग पूर्णपणे पाण्याविना राहणार आहेत.
पाणीपुरवठा सुरळीतपणे पूर्ववत करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पार पाडतील, असे आश्वासनही देण्यात आले आहे. पाणीकपातीतून निर्माण होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन TMC कडून वारंवार करण्यात येत आहे.
या पाणीकपातीनंतर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा. तसेच, पालिकेच्या सोशल मीडिया आणि अधिकृत संकेतस्थळावर अद्ययावत माहिती पाहावी, अशी सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter