पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणातील पाण्याचा रंग हिरवागार झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवत तातडीचे आदेश दिले आहेत.
सायली मेमाणे
पुणे २३ जुलै २०२५ : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या येसाजी कंक जलाशय अर्थात भाटघर धरणात अचानकपणे पाण्याचा रंग हिरवागार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेषतः धरणाच्या बॅकवॉटर भागात संगमनेर, माळवाडी आणि नऱ्हे गावांच्या परिसरात हे पाणी प्रखर हिरवे दिसत आहे. या बदलामुळे स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि पाण्याच्या वापरकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
या बदलाची दखल प्रशासनाने घेतली असून, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी तातडीने जलतपासणीचे आदेश दिले आहेत. जलाशयातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, या घटनेमागील संभाव्य कारणांचा शोध घेतला जात आहे. याशिवाय पाण्यात साचलेला तवंग आणि शेवाळ त्वरित काढून टाकण्याच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. या बदलामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, शेतीला होणारे पाणीपुरवठा आणि आरोग्य विषयक परिणाम याबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
स्थानिकांनी पाण्याच्या रंगात झालेला हा बदल जैविक की रासायनिक आहे, हे वैज्ञानिक पद्धतीने स्पष्ट करून जनतेपुढे माहिती मांडण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून पारदर्शक कारवाई होणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या संदर्भात सहायक अभियंता गणेश टेंगळे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, धरणात मत्स्यपालनासाठी ठेवण्यात आलेल्या पिंजऱ्यांमध्ये टाकण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे जलाशयात शेवाळाची वाढ झपाट्याने होते आणि परिणामी पाण्याचा रंग हिरवा होतो. हे पाणी काही कालावधीनंतर पूर्ववत होण्याची शक्यता असून, त्यामुळे तातडीने निर्णय घेणे आणि वैज्ञानिक विश्लेषण करणे अत्यावश्यक आहे.
या घटनेमुळे पर्यावरणीय सुरक्षितता, पिण्याचे पाणी आणि शेतीच्या दृष्टिकोनातून गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रशासनाने या विषयात तातडीने, सखोल आणि पारदर्शक पद्धतीने कारवाई करणे आवश्यक आहे. प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतरच या बदलामागील कारणे स्पष्ट होतील आणि नागरिकांच्या चिंतेला उत्तर मिळेल.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter