सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नापणे धबधब्यावर महाराष्ट्रातील पहिले ग्लास ब्रिज पर्यटकांसाठी खुले. ₹99.63 लाखांच्या सिंधुरत्न योजनेंतर्गत साकारलेले हे नवीन इको-टुरिझम आकर्षण आता खुले.
सायली मेमाणे
पुणे २५ जुलै २०२५ : महाराष्ट्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी एक नवीन आकर्षण उदयास आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात नापणे धबधब्यावर राज्यातील पहिले ग्लास ब्रिज उभारण्यात आले असून, ते मंगळवारी (२३ जुलै २०२५) पर्यटकांसाठी अधिकृतपणे खुले करण्यात आले. हा ब्रिज नाधवडे गावाजवळ कोल्हापूर-तारळे राष्ट्रीय महामार्गालगत आहे आणि त्याचा उद्देश इको-टुरिझमला चालना देणे हा आहे.
सिंधुरत्न पर्यटन योजनेअंतर्गत ₹९९.६३ लाखांच्या खर्चातून साकारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे नापणे धबधब्याच्या सौंदर्याचा अद्वितीय अनुभव घेता येणार आहे. हा पारदर्शक ग्लास ब्रिज धबधब्याच्या थेट वर उभारण्यात आलेला असून, पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात थरारक अनुभव देतो.
राज्यमंत्री नितेश राणे यांनी या पुलाचे उद्घाटन करत ही माहिती सोशल मीडियावर दिली. त्यांनी याला वैभववाडीच्या पर्यटनाच्या दृष्टीने ‘मैळाचा दगड’ ठरवले आहे. यामुळे स्थानिक रोजगार व पर्यटन उद्योगालाही चालना मिळणार आहे.
नापणे धबधबा हे ठिकाण बारमाही प्रवाह व घनदाट हिरवाईसाठी प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात इथे कुटुंबांसह निसर्गप्रेमी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. नाधवडे गावापासून केवळ ६ किमी आणि वैभववाडी रेल्वे स्थानकापासून ३ किमी अंतरावर असल्यामुळे हे ठिकाण सहज पोहोचण्यासारखे आहे.
पावसाळ्यात धबधब्याचा प्रवाह अधिक वेगवान व आकर्षक होतो. अशा वेळीही पर्यटकांना धबधबा अनुभवता यावा म्हणून या ग्लास ब्रिजची उभारणी झाली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व आवश्यक उपाययोजना केल्या गेल्या आहेत.
हा ग्लास ब्रिज उघडल्यामुळे नापणे धबधबा महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक अर्थव्यवस्था, पर्यावरणपूरक पर्यटन आणि राज्यातील निसर्ग पर्यटनाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter