स्मार्ट मीटरविरोधात ठिय्या आंदोलन: महावितरणला आठ दिवसांत निर्णयाचे लेखी आश्वासन
स्मार्ट मीटरविरोधात महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन; शेकापचा आक्रमक लढा यशस्वी
अलिबागमधील महावितरण कार्यालयासमोर स्मार्ट मीटरविरोधात शेकापचे आंदोलन; नागरिकांना आलेल्या भरमसाठ विजबिलांमुळे संताप, आठ दिवसांत कार्यवाहीचे लेखी आश्वासन.
सायली मेमाणे
पुणे १ ऑगस्ट २०२५ : अलिबाग (रायगड) : रायगड जिल्ह्यातील अलिबाग व परिसरात नागरिकांच्या परवानगीशिवाय बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरविरोधात संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. विजेचे बिल स्मार्ट मीटरमुळे भरमसाठ येऊ लागल्याचा आरोप करत शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली चेंढरे येथील महावितरण कार्यालयावर हे आंदोलन झाले.
स्मार्ट मीटर बसवण्यामागील पारदर्शकतेचा अभाव, तसेच त्यानंतर आलेली अवाजवी विजबिलं, यामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. आंदोलनकर्त्यांनी “स्मार्ट मीटर बसवणे बंद करा”, “अत्याधिक आलेली बिलं रद्द करा”, अशा ठाम मागण्या करत हल्लाबोल आंदोलन केले.
या आंदोलनामुळे अखेर महावितरणचे अधिकारी झुकले आणि आठ दिवसांत योग्य कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी नागरिकांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहण्याचा इशारा दिला आहे.
शेकापच्या स्थानिक नेतृत्वाखाली हे आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने पार पडले. या लढ्यामुळे आता संपूर्ण रायगड जिल्ह्यात स्मार्ट मीटरविरोधातील असंतोषाचे पडसाद उमटू शकतात, अशी शक्यता आहे.