चाकण औद्योगिक परिसरातील विजेच्या समस्यांवर महावितरणचे तातडीने उपाय; उद्योगांना अखंडित वीजपुरवठ्याचे आश्वासन
चाकण औद्योगिक परिसरातील विजेच्या समस्यांवर महावितरणकडून तातडीच्या उपाययोजना; उद्योगांना अखंडित वीजपुरवठ्याचे आश्वासन
चाकण औद्योगिक परिसरातील विजेच्या समस्यांवर महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांचे तातडीच्या उपाययोजनेचे आश्वासन. उद्योगांना अखंडित वीजपुरवठा आणि 5 वर्षे वीजदर वाढणार नाहीत.
पुणे ११ ऑगस्ट २०२५ : चाकण परिसरात मागील अनेक महिन्यांपासून विजेचा प्रश्न गंभीर बनला असून या समस्येचा थेट परिणाम औद्योगिक उत्पादनावर होत आहे. कारखान्यांमध्ये वारंवार होणारे पावर फेल्युअर, व्होल्टेज फ्लक्ट्यूएशन आणि एक्सप्रेस फीडरवरील डीप्स यामुळे उद्योगांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. मशीनच्या देखभालीचा खर्च वाढला असून उत्पादनात खंड पडत आहे, कच्चा माल वाया जात आहे आणि उत्पादकता घटत आहे. ही परिस्थिती केवळ उद्योगांवरच नव्हे तर महावितरणच्या महसुलावर देखील नकारात्मक परिणाम घडवत आहे.

या पार्श्वभूमीवर फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे ऑफिस प्रतिनिधी श्री. दिलीप बटवाल आणि श्री. विनोद जैन यांनी 8 ऑगस्ट 2025 रोजी पुण्यातील प्रकाशभवन येथे महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्रा (आयएएस) यांची भेट घेतली. या वेळी एमएसईडीसीएलचे प्रकल्प संचालक श्री. तालेवार आणि मानव संसाधन संचालक श्री. राजेंद्र पवार उपस्थित होते. फेडरेशनच्या प्रतिनिधींनी बैठकीत स्पष्ट केले की चाकण परिसरातील एमएसईडीसीएलची पायाभूत यंत्रणा पूर्णपणे ओव्हरलोड झाली असून पावर शॉर्टेज निर्माण झाला आहे.
उद्योग प्रतिनिधींनी हेही निदर्शनास आणून दिले की उद्योगांकडून महावितरणसाठी स्वखर्चाने जागा उपलब्ध करून दिली जाते तसेच स्विचिंग स्टेशन, पावर स्टेशन उभारण्यासाठी आणि फीडर तयार करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. तरीही विजेच्या समस्यांवर समाधानकारक उपाय न होणे हे चिंताजनक आहे.
बैठकीदरम्यान महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्रा यांनी फेडरेशनला दिलासा देत आश्वासन दिले की येत्या वर्षभरात चाकण परिसरातील एमएसईडीसीएलची यंत्रणा सक्षम केली जाईल. त्यांनी सांगितले की पुढील वर्षभर उद्योगांना गुणवत्तापूर्ण आणि अखंडित वीजपुरवठा दिला जाईल आणि पॉवर शॉर्टेज होणार नाही. शिवाय पुढील पाच वर्षांपर्यंत वीजदर वाढणार नाहीत याचीही त्यांनी खात्री दिली. महावितरणकडून यापुढे उद्योगांना वीज संदर्भात तक्रार करण्याची वेळ येणार नाही असेही त्यांनी नमूद केले.
या आश्वासनामुळे चाकण औद्योगिक परिसरातील उद्योगविश्वाला दिलासा मिळाला असून आता सर्वांचे लक्ष महावितरणच्या अंमलबजावणीवर आहे. स्थिर आणि अखंडित वीजपुरवठा मिळाल्यास चाकणमधील उत्पादनक्षमता वाढेल, आर्थिक नुकसान कमी होईल आणि राज्याच्या महसुलातही भर पडेल.