इंद्रायणी नदीच्या निळ्या रेषेत बांधकामाची कारवाई : पीसीएमसीच्या कारवाईवर संतप्त प्रतिक्रिया, भ्रष्टाचाराचे आरोप
टिकम शेखावत
पिंपरी-चिंचवड, १७ मे २०२५ — सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील आदेशानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून (PCMC) इंद्रायणी नदीच्या निळ्या रेषेत बांधलेली घरे आज हटविण्यात आली. या कारवाईमुळे अनेक कुटुंब बेघर झाले असून त्यांनी महापालिकेच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पीडित नागरिकांनी सांगितले की, त्यांनी महापालिकेला नियमितपणे घरकर भरला असून, अधिकृतरित्या पाणीपुरवठाही घेतला जात होता. त्यामुळे “महापालिकेच्या अधिकारक्षेत्रात राहत असूनही, आमची घरे अनधिकृत म्हणून पाडण्यात आली,” अशी भावना त्यांनी मांडली.
या प्रकरणात एक गंभीर आरोप समोर आला आहे. ‘शिरसाठ’ या आडनावाच्या व्यक्तीने घरे बांधत असताना काही नागरिकांकडून पैसे घेऊन “कारवाई होणार नाही” असे खोटे आश्वासन दिल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
NewsDotz शी बोलताना पीसीएमसी आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, “जर नागरिकांनी तक्रार केली, तर महापालिकेकडून निश्चितच तपास केला जाईल. तसेच महापालिका स्वतःहूनही (suo moto) विभागीय चौकशी सुरू करेल आणि आवश्यक असल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल.”
सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, महापालिकेकडून पारदर्शक आणि योग्य पद्धतीने कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान, नागरिकांनी या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची आणि न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.