BDD Chawl Redevelopment: वरळीतील ५५६ घरांचे चावीवाटप; फडणवीस म्हणाले, गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न पूर्ण
वरळीतील ५५६ घरांचे चावीवाटप; फडणवीस म्हणाले, गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न पूर्ण
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात ५५६ घरांचे चावीवाटप; CM फडणवीस म्हणाले, गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न पूर्ण. धारावी पुनर्विकासाचाही उल्लेख.
सायली मेमाणे
पुणे १४ ऑगस्ट २०२५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पुनर्वसन इमारतीचे उद्घाटन करताना बीडीडी चाळ म्हणजे स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांचे स्वप्न असल्याचे सांगितले आणि धारावी पुनर्विकासाचे कामही सरकारने हाती घेतल्याची माहिती दिली. माटुंगा येथील यशवंत मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात ५५६ सदनिकांच्या चाव्या लाभार्थ्यांना वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे कारण बीडीडी चाळीतील नागरिकांचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. बीडीडी चाळीने गेल्या शंभर वर्षांमध्ये अनेक सामाजिक आंदोलनांचा आणि स्वातंत्र्याच्या चळवळीचा साक्षीदार राहिला आहे. या चाळीच्या भिंतींमध्ये असंख्य कहाण्या दडल्या आहेत आणि अनेकांचे दुःखही या भिंतींनी पाहिले आहे. वारंवार बीडीडी चाळीच्या विकासाची मागणी होत होती आणि लोकांच्या घरातील वाईट परिस्थिती पाहून या पुनर्विकासाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवली. फडणवीस यांनी सांगितले की, काही घरांमध्ये भेट दिली असता स्थिती झोपडपट्टीपेक्षाही वाईट असल्याचे दिसून आले.
महायुती सरकार आल्यानंतर बीडीडी चाळ पुनर्विकासाचा मुद्दा पहिल्यांदा प्राधान्याने हाती घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पात अनेक अडचणी आल्या, मात्र त्या सर्वांवर मात करून ग्लोबल टेंडर काढण्यात आले. वरळीतील काम टाटा आणि एलएनटी या प्रतिष्ठित कंपन्यांनी घेतले. उच्च दर्जाची स्पेसिफिकेशन्स ठरवण्यात आली आणि २२ एप्रिल रोजी टेंडर प्रक्रियेनंतर भूमिपूजनही झाले. त्यानंतरही काही अडचणी उभ्या राहिल्या, पण त्या दूर करत जलदगतीने काम सुरू करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की या प्रकल्पात अनेकांनी सहकार्य केले. महायुती सरकारचे धोरण हे नेहमीच समाजाच्या हितासाठी ठोस पावले उचलण्याचे राहिले आहे. पोलिसांसाठी घरांचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांची होती आणि आज ती पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. पोलिस बांधवांना अवघ्या १५ लाख रुपयांत घरे उपलब्ध झाली आहेत. वरळीमध्ये ९ हजार घरे आणि एकूण १४ हजार घरे देण्याचे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस यांनी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला केवळ बांधकाम प्रकल्प म्हणून न पाहता, तो एक सामाजिक परिवर्तनाचा टप्पा असल्याचे म्हटले. जुन्या, अस्वच्छ आणि धोकादायक घरांमधून आधुनिक, सुरक्षित आणि सुविधा असलेल्या घरांमध्ये स्थलांतर हे नागरिकांच्या जीवनमानात मोठा बदल घडवणारे आहे. धारावी पुनर्विकासासारखेच हेही एक ऐतिहासिक पाऊल आहे, ज्यामुळे हजारो कुटुंबांचे भविष्य बदलणार आहे.