Beed News: सयाजी शिंदे यांच्या देवराईला आग; हजारो झाडे जळून खाक, घातपाताचा संशय
Beed News: सयाजी शिंदे यांच्या देवराईला आग; हजारो झाडे जळून खाक, घातपाताचा संशय
बीड जिल्ह्यातील पालवणजवळ अभिनेता सयाजी शिंदे यांच्या देवराई प्रकल्पात भीषण आग लागून हजारो झाडे जळून खाक झाली. साधुग्राम व तपोवन वृक्षतोडीविरोधातील भूमिकेचा सूड उगवण्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून, सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पुणे २५ डिसेंबर २०२५ : बीड जिल्ह्यातील पालवण परिसरात अभिनेता सयाजी शिंदे यांनी अत्यंत जिव्हाळ्याने उभारलेल्या देवराई प्रकल्पात अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीत हजारो झाडे जळून खाक झाल्याने पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हा प्रकार अपघाती की जाणीवपूर्वक घडवून आणलेला, असा प्रश्न उपस्थित होत असून, ‘आग लागली की लावली?’ अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.
सयाजी शिंदे यांनी अनेक वर्षांच्या मेहनतीतून बीड जिल्ह्यातील कोरड्या आणि दुष्काळी भागात देवराई प्रकल्प साकारला होता. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत त्यांनी झाडे लावून ती स्वतःच्या मुलांसारखी जपली होती. मात्र, अचानक लागलेल्या आगीमुळे हा संपूर्ण परिसर काळवंडून गेला असून, झाडांसह अनेक पक्षी, प्राणी आणि जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी ही आग अपघाती नसून घातपात असल्याचा थेट आरोप केला आहे. विशेष म्हणजे, तपोवनातील वृक्षतोड आणि साधुग्राम प्रकल्पाविरोधात सयाजी शिंदे यांनी उघडपणे भूमिका घेतली होती. साधुग्रामसाठी कुंभमेळ्याच्या तयारीदरम्यान १८०० झाडे तोडण्याच्या निर्णयाविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. “साधू आले-गेले तरी चालतील, पण झाडे राहिली पाहिजेत,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली होती.
या विषयावर चर्चा करण्यासाठी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. नाशिकसह राज्यभरातील पर्यावरणप्रेमींनी या निर्णयाविरोधात आंदोलन केले होते आणि सयाजी शिंदे हे या चळवळीचे प्रमुख चेहरे मानले जात होते. त्यामुळेच आता देवराईतील आगीमागे याच विरोधाचा सूड उगवण्यात आला असावा, असा संशय अनेकांकडून व्यक्त केला जात आहे.
सोशल मीडियावर उमटलेल्या प्रतिक्रियांमध्ये राजकीय आरोप, संताप आणि हळहळ यांचा मिलाफ पाहायला मिळतो. काहींनी सत्ताधारी टोळ्यांवर गंभीर आरोप केले आहेत, तर काहींनी “हा सूड आहे, आग लावलीच असणार” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. पशुपक्ष्यांचा विचार न करता केलेल्या या कृत्याचा निषेध करत, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
दरम्यान, काही नागरिकांनी सयाजी शिंदे यांना धीर देत “खचून न जाता पुन्हा जोमाने काम सुरू करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत” असा पाठिंबा दर्शवला आहे. लहान मुलांप्रमाणे वाढवलेल्या झाडांचे असे नुकसान होणे ही केवळ एका व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण समाजाची हानी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे पर्यावरण सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वनसंपदेचे संरक्षण करणाऱ्यांनाच जर अशा प्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागत असेल, तर भविष्यात पर्यावरण चळवळींचे काय होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाने या आगीची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information