ED चा छापा: अनिलकुमार पवारांच्या बदलीनंतर 11 दिवसांनी पदत्याग, 12 ठिकाणी छापेमारी
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर ईडीचे छापे; बदलीनंतरही 11 दिवस पदावर राहिल्याने संशय
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या बदलीनंतर 11 दिवसांनीच पदत्याग; दुसऱ्याच दिवशी ईडीचा त्यांच्या निवासस्थानी छापा, एकूण 12 ठिकाणी छापेमारी; आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर आरोप.
सायली मेमाणे
पुणे 30 जुलै २०२५ : Virar-Vasai News : वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. 17 जुलै 2024 रोजी त्यांची बदली मुंबई महानगर प्रदेश गृहनिर्माण प्राधिकरण (MMR SRA), ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली होती. मात्र त्यांनी तब्बल 11 दिवसांनंतर म्हणजेच 28 जुलै रोजीच पदभार सोडला. या विलंबामुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत आणि यामागे कोणती कारणे आहेत, यावर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, त्यांनी पदभार सोडल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 29 जुलै रोजी त्यांच्या वसईतील शासकीय निवासस्थानी आणि नाशिक, पुणेसह 12 ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापे टाकले. या कारवाईने खळबळ उडाली असून, हे छापे अनिलकुमार पवार यांच्यावरील गंभीर आरोपांमुळे टाकण्यात आल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते.
अहवालानुसार, पवार यांनी बदलीच्या आदेशानंतर देखील काही दिवस वसई-विरार महापालिकेच्या आयुक्त पदावर राहून महत्त्वाचे शासकीय निर्णय घेतले, काही इमारतींसाठी ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (CC) जारी केले, ठेकेदारांशी संबंधित फायली क्लिअर केल्या, तसेच आर्थिक व्यवहारांमध्ये हस्तक्षेप केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच ईडीकडून त्यांच्याशी संबंधित ठिकाणी छापेमारी करण्यात आली असावी, अशी शक्यता आहे. दरम्यान, त्यांच्या सन्मानार्थ आयोजित निरोप समारंभाच्या दुसऱ्याच दिवशी ही कारवाई घडल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हे केवळ एक योगायोग आहे की पूर्वनियोजित तपासाची सुरुवात, यावर अजून स्पष्टता आलेली नाही.
या घडामोडींमुळे वसई-विरार महापालिका प्रशासन आणि ठाणे MMR SRAमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अनिलकुमार पवार यांच्याजागी मनोजकुमार सूर्यवंशी यांची वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी कार्यभार स्वीकारल्याची माहिती आहे. परंतु या अचानक आलेल्या छाप्यांमुळे मनपा प्रशासनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पवार यांच्यावरील ही कारवाई पुढे कोणते नवीन खुलासे समोर आणते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.