Ganesh Utsav 2025: लक्ष्मी रस्त्यावर धोकादायक आवाज, खंडोजी बाबा चौकात 109 डेसिबल नोंद
लक्ष्मी रस्त्यावर धोकादायक आवाज, खंडोजी बाबा चौकात 109 डेसिबल नोंद
Ganesh Utsav 2025 मध्ये लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषणाची पातळी धोकादायक; सीओईपी अहवालानुसार खंडोजी बाबा चौकात 109 डेसिबल नोंदली गेली.
सायली मेमाणे
पुणे ८ सप्टेंबर २०२५ : पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा ध्वनी प्रदूषणाची पातळी धोकादायक श्रेणीत पोहोचली आहे. विसर्जनाच्या चोवीस तासातली सरासरी आवाजाची पातळी मागच्या वर्षीच्या तुलनेत किंचित कमी असली तरी ही अजूनही आरोग्यासाठी हानिकारक आहे. यंदा हरित न्यायाधिकरणाच्या आदेश आणि उच्च न्यायालयाच्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर ध्वनी पातळी किती असेल याची उत्सुकता सर्वांमध्ये होती.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने जाहीर केलेल्या अहवालानुसार, सहा आणि सात सप्टेंबर रोजी लक्ष्मी रस्त्यावरील दहा महत्त्वाच्या चौकांमध्ये आवाज मोजमाप करण्यात आले. सरासरी ९२.६ डेसिबल इतकी पातळी नोंदवली गेली. खंडोजी बाबा चौकात तर १०९ डेसिबल इतका प्रचंड आवाज मोजला गेला, जो ‘आरोग्याला हानिकारक’ श्रेणीत मोडतो. हे लक्षात घेता लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब किंवा मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
ठिकाणनिहाय सरासरी आवाजाची पातळी अशी नोंदवली गेली: बेलबाग चौक – ९८.८ डेसिबल, गणपती चौक – ९२.७ डेसिबल, लिम्बराज चौक – ९३.४ डेसिबल, कुंटे चौक – ९५.२ डेसिबल, उंबऱ्या चौक – ९१.९ डेसिबल, गोखले चौक – ९३.७ डेसिबल, शेडगे विठोबा चौक – ९३.९ डेसिबल, होळकर चौक – ९४.७ डेसिबल, टिळक चौक – ८९.५ डेसिबल, खंडूजी बाबा चौक – ८२.१ डेसिबल (कमाल पातळी १०९ डेसिबल).
अहवालानुसार गेल्या काही वर्षांत कार्यकर्ते आणि भाविकांमध्ये ध्वनी प्रदूषणाबाबत जागरूकता वाढली आहे. त्यामुळे पारंपारिक ढोल-ताशा आणि आधुनिक डीजेच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी प्रयत्न दिसून आले आहेत. करोनानंतर नियम आणि स्वयंशिस्तीमुळे आवाजाची पातळी काही प्रमाणात कमी झाल्याचे लक्षात आले आहे.
वास्तविक, विसर्जनाच्या दिवशी २४ तासात आवाजाची पातळी काही प्रमाणात घटली असली तरीही काही ठिकाणी ती १०० डेसिबलच्या पुढे पोहोचते. हे दर्शवते की अजूनही जनजागृतीची आवश्यकता आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा उच्च पातळीचा आवाज कानासाठी, मानसिक स्वास्थ्यासाठी तसेच रक्तदाबावर परिणाम करू शकतो.
यंदा गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणाच्या आकड्यांमुळे वातावरणीय नियमांचे पालन आणि समुदायाच्या जागरूकतेचा परिणाम स्पष्ट झाला आहे. भाविकांनी आणि आयोजकांनी ध्वनी नियंत्रणासाठी पुढाकार घेतल्यामुळे विसर्जन मिरवणुकीतील उत्साह आणि आरोग्य दोन्ही संतुलित ठेवण्यास मदत झाली आहे.