कपिल शर्मा शोवर मनसेचा इशारा; बॉम्बेऐवजी मुंबईचं नाव वापरा
कपिल शर्मा शोवर मनसेचा इशारा; बॉम्बेऐवजी मुंबईचं नाव वापरा
मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी कॉमेडियन कपिल शर्माला थेट इशारा दिला आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये बॉम्बेऐवजी मुंबईचं उल्लेख करण्यास सांगितलं; ऐकलं नाही तर सेटवर आंदोलन.
सायली मेमाणे
पुणे ११ सप्टेंबर २०२५ : मुंबई: कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा आता मनसेच्या रडारवर आला आहे. मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी कपिल शर्मा आणि त्याच्या टीमला थेट इशारा दिला आहे की, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये शहराचे नाव बॉम्बेऐवजी मुंबई असं घ्यावं. जर हा बदल केला नाही किंवा ऐकलं नाही, तर मनसे सेटवर जाऊन आंदोलन करेल आणि शूटिंग थांबवेल, अशी धमकी त्यांनी दिली आहे.
अमेय खोपकर म्हणाले की, मुंबईचं अधिकृत नामकरण 1995 मध्ये महाराष्ट्र शासनाने आणि 1996 मध्ये केंद्र शासनाने मान्य केले आहे. मात्र, बॉलिवूड, हिंदी चित्रपट आणि ओटीटीवरील वेब सीरिजमध्ये अजूनही बॉम्बे असा उल्लेख होत आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, कपिल शर्मा शोमध्ये अनेक सेलिब्रिटी गेस्ट, दिल्लीतील राज्यसभा खासदार आणि शो अँकर यांद्वारेही बॉम्बेचा उल्लेख सर्रास केला जातो. हे शहराचं मान राखण्यासाठी योग्य नाही, असे त्यांनी नमूद केले.
खोपकर यांनी सांगितले की, फक्त कपिलच्या शोमध्येच नाही तर हिंदी चित्रपट, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिजमध्येही जाणूनबुजून बॉम्बे असं शहराचं नाव घेतलं जात आहे. ते म्हणाले, “चेन्नई किंवा बंगळुरूसारख्या शहरांचे नाव नीट घेतलं जातं, पण मुंबईच्या बाबतीत लोक अजूनही बॉम्बे वापरतात. आम्ही कोणाच्या विरोधात नाही, फक्त शहराचं नाव मुंबईचं योग्य प्रकारे वापरावं अशी विनंती आहे.”
अमेय खोपकर यांनी कपिलच्या टीमकडे पत्र पाठवले असून, त्यात स्पष्ट केले आहे की जर शोमध्ये सुधारणा केली नाही, तर सेटवर जाऊन मनसेकडून आंदोलन केले जाईल आणि शूटिंग थांबवले जाईल. त्यांनी कपिलला अजूनही शहराचं नाव नीट घेता येत नसल्याचंही म्हटलं.
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे आणि यामध्ये येणाऱ्या सेलिब्रिटींकडून मुंबईऐवजी बॉम्बे हा उल्लेख अनेकदा केला जातो. यामुळे मनसेने सेटवर थेट कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
आता सर्वांचं लक्ष कपिल शर्मा किंवा त्याच्या टीमकडून होणाऱ्या उत्तरावर आहे. ते या इशाऱ्यावर काय प्रतिक्रिया देतात आणि शोमध्ये शहराचं नाव बदललं जातं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनसेचा हा इशारा मुंबईच्या अधिकृत नावाच्या मान राखण्यासाठी एक गंभीर प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे.