Kolhapur News: ठाकरे गटात जिल्हाप्रमुख निवडीवरून वाद; हर्षल सुर्वेंचा उरावर बसवणार नाही असा इशारा
हर्षल सुर्वेंनी स्पष्ट शब्दांत इंगवले यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास नकार दिला आहे.
कोल्हापुरात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदावर रविकरण इंगवले यांच्या नियुक्तीनंतर पक्षात अंतर्गत वाद उफाळून आला आहे. हर्षल सुर्वेंनी स्पष्ट शब्दांत इंगवले यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास नकार दिला आहे.
सायली मेमाणे
कोल्हापुरा २८ जून २०२५ : कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरे गटामध्ये जिल्हाप्रमुखपदावरून मोठा अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. रविकरण इंगवले यांची कोल्हापूर जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती होताच पक्षातील वरिष्ठ नेते हर्षल सुर्वे यांनी त्यांच्याविरोधात थेट आवाज उठवत काम करण्यास नकार दिला. “बनावटगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्याला आम्ही उरावर बसवून घेणार नाही,” असे ठाम वक्तव्य त्यांनी करत वरिष्ठ नेत्यांनाही स्पष्ट इशारा दिला आहे. “आमचे खांदे मजबूत आहेत. कोणाला उरावर घ्यायचं आणि कोणाला पाया ठेवायचं हे आम्ही ठरवतो,” असेही ते म्हणाले.
या वक्तव्यामुळे ठाकरे गटात आधीपासून असलेली अंतर्गत गळती पुन्हा एकदा उफाळून आली असून पक्षातील एकात्मतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सुर्वे यांनी आपल्या वक्तव्यात काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवरही निशाणा साधला असून, “महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस जर ठाकरे गटाच्या अंतर्गत निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करत असेल, तर त्यासारखं दुर्दैव नाही,” असे तीव्र शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
याशिवाय, त्यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी आपल्याला कोणतीही जबाबदारी मागितली नव्हती, त्यामुळे ती घेणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. यावरून पक्षातील मनोमिलनाचा अभाव आणि नेतृत्वातील निर्णयप्रक्रियेतील असहमतीचे चित्र स्पष्ट होत आहे. सुर्वे यांनी येत्या दोन दिवसांत अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी चर्चा करून आपला पुढील निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती दिली आहे.
हा वाद काही नवीन नाही. यापूर्वीही ठाकरे गटाच्या उपनेते संजय पवार आणि रविकिरण इंगवले यांच्यात वाद झाला होता. आता जिल्हाप्रमुख पदावर इंगवले यांची नियुक्ती झाल्यानंतर पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाची पकड आधीच सैल झाली असताना अशा अंतर्गत वादांनी पक्षाच्या संघटनेवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी एका बाजूला आणि नेतेमंडळी दुसऱ्या बाजूला उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले असून, यामुळे पक्षातील विचारधारेच्या एकात्मतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांच्या भावना आणि स्थानिक नेतृत्वाचे महत्त्व याकडे वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर याचा राजकीय फटका भविष्यात पक्षाला बसू शकतो.