मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी – अंतिम आराखडा प्रसिद्ध
मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी – अंतिम आराखडा प्रसिद्ध
राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेच्या सर्व २२७ प्रभाग रचनेस मंजुरी दिली असून अंतिम आराखडा शासन राजपत्रात आणि महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे.
सायली मेमाणे
पुणे ६ ऑक्टोबर २०२५ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत मोठा टप्पा गाठला गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ३१ जानेवारीपूर्वी सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर प्रभाग रचना अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची घडामोड घडली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने अखेर मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २२७ प्रभाग रचनेस मंजुरी दिली आहे. अंतिम आराखडा शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला असून, मुंबई महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निर्णयानंतर आता मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भातील पुढील प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात मोठी आणि संपन्न महानगरपालिका मानली जाते. त्यामुळे तिच्या निवडणुका राज्यासोबतच देशाच्या राजकीय समीकरणात महत्त्वाचा प्रभाव टाकतात. महापालिकेच्या २२७ प्रभागांची रचना निश्चित झाल्यानंतर आता विविध राजकीय पक्षांनी आपल्या रणनिती ठरविण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक प्रभागाचा सामाजिक आणि राजकीय गणित लक्षात घेऊन उमेदवारांची निवड आणि प्रचार आराखडा निश्चित करण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.
सर्वसामान्य मुंबईकरांनाही या प्रभाग रचनेची उत्सुकता होती. कारण प्रत्येक प्रभागातून निवडून येणारा नगरसेवक हा स्थानिक विकास आणि समस्यांचे निराकरण करण्यास महत्त्वपूर्ण ठरतो. अंतिम आराखड्यामुळे कोणत्या परिसराचा समावेश कोणत्या प्रभागात झाला आहे, याबाबत आता अधिकृत माहिती मिळाल्याने नागरिकांना आपल्या प्रतिनिधीविषयी स्पष्टता मिळाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेची प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी नागरिकांकडून हरकती व सुचवण्या मागविण्यात आल्या होत्या. त्या हरकतींचे परीक्षण करूनच अंतिम आराखडा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे आता निवडणुकीसंदर्भातील कोणताही कायदेशीर अडथळा उरणार नसल्याचे दिसते.
मुंबई महापालिका निवडणूक नेहमीच सत्ताधारी आणि विरोधकांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरते. शहरातील मोठ्या विकास प्रकल्पांपासून ते पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुरुस्ती अशा दैनंदिन प्रश्नांवर नगरसेवकांचे कामकाज ठरते. त्यामुळे २२७ प्रभागांतून निवडून आलेल्या प्रतिनिधींवर संपूर्ण शहराच्या विकासाचा भार असतो.
अंतिम प्रभाग रचनेला मंजुरी मिळाल्यामुळे आता निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होण्याच्या मार्गावर आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका केवळ महानगरापुरत्याच मर्यादित नसून राज्याच्या पुढील राजकीय समीकरणांना दिशा देणाऱ्या ठरतात. त्यामुळे या निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते.