मुंबईत डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाचा प्रादुर्भाव; टिळकनगर हॉटस्पॉट घोषित
मुंबईत डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाचा प्रादुर्भाव; टिळकनगर हॉटस्पॉट घोषित
मुंबईत डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाचा प्रादुर्भाव वाढला असून टिळकनगर परिसर हॉटस्पॉट बनला आहे. डेंग्यू रुग्णसंख्येत ४२% तर मलेरियाच्या रुग्णसंख्येत १७% वाढ झाली आहे.
सायली मेमाणे
पुणे ८ सप्टेंबर २०२५ : पावसाळ्यामुळे डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून मुंबईकरांसाठी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाचे रुग्ण वाढू लागल्याने सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. टिळकनगर परिसर सध्या हॉटस्पॉट बनला आहे. या भागातील एका इमारतीत सात नागरिकांना डेंगीची लागण झाली असून स्थानिकांमध्ये प्रचंड दहशत आहे.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, यंदा डेंगी रुग्णसंख्येत तब्बल ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत रुग्णसंख्येत ही वाढ अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. मलेरियाच्या रुग्णांमध्येही १७ टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यात चिकनगुनियाचे रुग्ण वाढल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे.
मुंबईत अनेक भागात पावसामुळे पाणी साचते आणि नाल्यांमधील साफसफाई वेळेवर न झाल्याने डासांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. परिणामी डासजन्य आजारांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. टिळकनगरमध्ये तर घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे नागरिक संतापले असून महापालिकेवर नाराजी व्यक्त करत आहेत.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, डेंगी व मलेरियाचे लक्षणे सुरुवातीला सौम्य ताप, अंगदुखी, डोकेदुखी अशी दिसतात. मात्र योग्य वेळी उपचार न मिळाल्यास ही स्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे ताप किंवा अंगदुखी जाणवल्यास तातडीने तपासणी करून उपचार घेणे आवश्यक आहे. तसेच घरी पाणी साचू न देणे, डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवणे आणि स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेने तातडीने टिळकनगर परिसरात फॉगिंग, लार्वा नाशक औषधांचा वापर आणि स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. नागरिकांनी देखील वैयक्तिक पातळीवर दक्षता घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, डासजन्य आजारांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी रुग्णालयांमध्ये विशेष वॉर्ड तयार करण्यात येत आहेत. तज्ज्ञांनी स्वच्छतेसोबतच मास्क वापरणे, पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करणे आणि मच्छरदाणीचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
मुंबईत डेंगी, मलेरिया आणि चिकनगुनियाचा वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी नागरिकांची जबाबदारीही महत्त्वाची आहे. प्रशासनाच्या उपाययोजना आणि नागरिकांचा सहकार्य या दोन्हींच्या मदतीनेच या आजारांवर नियंत्रण मिळवता येणार आहे.