Pune Airport: देशात नववा व्यग्र विमानतळ; वार्षिक ६८ हजार विमानफेऱ्यांसह १ कोटी प्रवाशांचा आकडा
पुणे विमानतळ देशात नववा व्यग्र ठरला.
पुणे विमानतळ देशात नववा व्यग्र ठरला. २०२४-२५ मध्ये एक कोटी चार लाख प्रवासी व ६८ हजार ८३० विमानफेऱ्या, धावपट्टी मर्यादित असूनही मोठी कामगिरी.
सायली मेमाणे
२६ जून २०२५ : पुणे – देशातील प्रमुख १० व्यग्र विमानतळांच्या यादीत पुणेच्या लोहगाव विमानतळाने स्थान मिळवले असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात पुणे देशातील नववा सर्वाधिक व्यग्र विमानतळ ठरला आहे. अल्प धावपट्टी आणि सीमित पायाभूत सुविधांमुळेही विमान वाहतुकीचा विस्तार रोखला गेला नसल्याचे हे सूचक आहे. गेल्या आर्थिक वर्षात एकूण ६८,000 विमानांचे आगमन-प्रस्थान लोहगाव विमानतळावरून नोंदवले गेले, तर प्रवाशांच्या संख्येने हा आकडा तब्बल १ कोटी ४ लाखांवर गेला आहे.
दिल्ली, मुंबई, बेंगळुरू या शहरांचे आंतरराष्ट्रीय विमानतळ देशात पहिल्या तीन क्रमांकावर असून, पुणेने या मोठ्या केंद्रांपाठोपाठ आपले स्थान मजबूत केले आहे. पुण्याचा हवाई दळणवळणातील वाढता सहभाग, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणांची वाढती मागणी, तसेच आयटी, शिक्षण आणि संरक्षण क्षेत्राच्या वाढत्या गरजांमुळे लोहगाव विमानतळावरचा भार वाढला आहे.
लोहगाव विमानतळाची धावपट्टी मर्यादित असूनही दिवसाकाठी सरासरी १८० पेक्षा अधिक विमानफेऱ्या पार पडत आहेत. त्यामध्ये दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर यांसारख्या देशांतर्गत शहरांबरोबरच दुबई, अबूधाबी, सिंगापूर यांसारख्या आंतरराष्ट्रीय मार्गांचाही समावेश आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या लोहगाव विमानतळावर नागरी विमान वाहतुकीसाठी स्वतंत्र टर्मिनल आहे. मात्र प्रवाशांची संख्या सतत वाढत असल्याने या विमानतळाच्या विस्तारीकरणाची मागणी वारंवार होत आहे. नवीन रनवे, अधिक विमानतळ जागा आणि तांत्रिक सुविधा यासाठी केंद्र सरकारकडून प्रस्तावित नियोजन सुरू आहे.
देशातील आर्थिक आणि औद्योगिक महत्त्व वाढवणाऱ्या पुणे शहरासाठी हवाई कनेक्टिव्हिटी एक अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतो आहे. सध्या सुरू असलेल्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे भविष्यात या क्षेत्राला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
धावपट्टी वाढविण्यासाठी…
पुणे विमानतळावरून देशातील ३५ शहरांसाठी विमान सेवा सुरू आहेत. त्यात तीन आंतरराष्ट्रीय विमान सेवेचा समावेश आहे. पुणे विमानतळावर नवीन टर्मिनल सुरू झाल्यामुळे प्रवाशांची क्षमता वाढली आहे. जुने टर्मिनल बंद करून त्या ठिकाणचा विकास केला जात आहे. त्यामुळे काही महिन्यांत प्रवासी क्षमता आणखी वाढणार आहे. पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लष्कराची आणि काही खासगी जागा भूसंपादित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या सर्व गोष्टींना यश आल्यास पुण्यातून उड्डाणे आणि प्रवासी संख्या वाढण्यास मदत होणार आहे.