पुणे स्मार्ट सिटी, पण मावळात अजूनही वीज समस्या कायम; उपाययोजनांसाठी आढावा बैठक
पुणे स्मार्ट सिटी, पण मावळात अजूनही वीज समस्या कायम; उपाययोजनांसाठी आढावा बैठक
Pune Smart City 2025: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील दुर्गम भागांमध्ये अजूनही वीज समस्या कायम. आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उपाययोजना व सबस्टेशन उभारणीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय.
सायली मेमाणे
पुणे ४ सप्टेंबर २०२५ : पुणे जिल्हा स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असला तरी अजूनही मावळ तालुक्यातील अनेक दुर्गम भागांमध्ये वीजपुरवठ्याची गंभीर समस्या कायम आहे. आयटी आणि शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेल्या पुणे जिल्ह्यात अजूनही गावागावांत अंधार पसरतो हे दुर्दैवी वास्तव आहे. या समस्येच्या पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातील वीज प्रश्न सोडवण्यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
ही बैठक पुणे मंडळाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांच्या दालनात झाली. 2023-24 आणि 2024-25 या कालावधीत डीपीडीसी निधीतून मंजूर झालेल्या कामांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. दुर्गम भागांतील नागरिकांना अखंड व दर्जेदार वीजपुरवठा मिळावा यावर भर देत आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना ठोस पावले उचलण्यास सांगितले.
राजमाची, कळकराई यांसारख्या भागांमध्ये वीज पुरवठ्याचे काम वनविभागाच्या परवानगीशिवाय शक्य नसल्याने विलंब होत आहे. त्यामुळे ही परवानगी तातडीने मिळवून वीज समस्या सोडवण्याचे आदेश देण्यात आले. त्याचबरोबर वडेश्वर सबस्टेशनचे काम जलद गतीने सुरू करून सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले.
शहरी भागांसाठीही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कामशेत शहरातील नागरिकांनी व्यक्त केलेल्या असमाधानावर उपाय म्हणून फीडर, कंडक्टर आणि जी.ओ.डी. बदलण्याचे आदेश देण्यात आले. ग्रामीण भागातील जुने झालेल्या डीपी बॉक्स बदलून नवे बसविण्याचे निर्देश दिले गेले. देहू शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
देहूरोड कॅंटोन्मेंट भागातील वारंवार होणाऱ्या वीज समस्यांवरही विस्तृत चर्चा झाली. स्थानिक नागरिकांच्या तक्रारींचा गांभीर्याने विचार करून तातडीच्या उपाययोजना करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. या बैठकीस अधीक्षक अभियंता युवराज जरग, सिंहाजी गायकवाड, कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी, अतुल देवकर, किरण सरोदे तसेच वडगाव, लोणावळा, तळेगाव, देहू व देहूरोड येथील विद्युत वितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर आमदार सुनील शेळके म्हणाले की, “मावळवासीयांना अखंड आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा हे आमचे प्राधान्य आहे. गावागावांमधील वीजेचा लपंडाव दूर करून दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे हीच आमची बांधिलकी आहे. यासाठी आम्ही सर्व स्तरांवर सातत्याने प्रयत्नशील आहोत.”
पुणे जिल्हा स्मार्ट सिटी बनत असताना ग्रामीण आणि दुर्गम भागात अजूनही वीज समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. मात्र आता प्रशासन आणि जनप्रतिनिधी यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे या समस्या लवकरच दूर होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.