अलमट्टी धरण वाद: फडणवीसांनी केंद्र सरकारकडे धरणाची उंची वाढवू नये अशी मागणी
अलमट्टी धरण उंची वाढवण्यावरून वाद तापला; मुख्यमंत्री फडणवीसांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या तयारीत, फडणवीसांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र, सांगली-कोल्हापुरात पूरस्थितीचा धोका वाढणार?
सायली मेमाणे
पुणे १ ऑगस्ट २०२५ : कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव सादर झाल्याने महाराष्ट्रात विशेषतः सांगली व कोल्हापूर परिसरात संभाव्य पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना पत्र लिहून धरणाची उंची वाढवू नये, अशी स्पष्ट मागणी केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये दरवर्षी पुराचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये 2019 साली आलेल्या महापुराचा संदर्भ देत, त्यांनी भविष्यातील संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी केंद्र सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.
अलमट्टी धरणाची सद्यस्थिती 519 मीटर इतकी असून कर्नाटक सरकार ती 524 मीटरपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे. ही उंची वाढवल्यास 200 TMC पेक्षा अधिक जलसाठा अलमट्टीमध्ये होईल, आणि पावसाळ्यात पाणी सोडल्यावर महाराष्ट्रात अचानक पूरपरिस्थिती उद्भवू शकते, असा इशारा तज्ज्ञांनीही दिला आहे.
या निर्णयावरून दोन्ही राज्यांमध्ये राजकीय व जलनियोजनाच्या बाबतीत नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे. फडणवीसांनी पत्रात ही बाब नदी जलवाटपाच्या पंचवार्षिक योजनांशीही विसंगत असल्याचे नमूद केले आहे.
राजकीय स्तरावर या मुद्यावरून प्रतिक्रिया उमटत असून महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका स्पष्टपणे मांडल्यामुळे पुढील निर्णय केंद्र सरकारकडे असणार आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारकडून हस्तक्षेपाची मागणी जोर धरत आहे.