प्रो गोविंदा स्पर्धेतून ‘जय जवान’ गोविंदा पथक बाहेर; नियम बदलून बाहेर केल्याचा आरोप
प्रो गोविंदा स्पर्धेतून ‘जय जवान’ गोविंदा पथक बाहेर; नियम बदलून बाहेर केल्याचा आरोप
प्रो गोविंदा स्पर्धेतून देशभर प्रसिद्ध ‘जय जवान’ गोविंदा पथक बाहेर; प्रवेश निकष आणि वेळ न पाळल्याचा कारणावरून वाद, पथकाचा आरोप – नियम बदलून बाहेर केले.
सायली मेमाणे
पुणे 30 जुलै २०२५ : मुंबईत दरवर्षी जल्लोषात साजरा होणाऱ्या गोविंदा उत्सवाचे आकर्षण असलेल्या प्रो गोविंदा स्पर्धेत यंदा एक मोठी खळबळजनक घटना घडली आहे. देशभरात आपल्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे प्रसिद्ध असलेल्या ‘जय जवान’ गोविंदा पथकाला यंदा या स्पर्धेतून वगळण्यात आले आहे. प्रवेशासाठी आवश्यक निकष आणि वेळेचे पालन न केल्यामुळे या पथकाला सहभागी होण्यापासून रोखण्यात आले, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. मात्र, जय जवान पथकाने या निर्णयावर आक्षेप घेतला असून, हे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने झाले असून त्यांच्या विरोधात नियम बदलण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.
जय जवान गोविंदा पथकाने असा दावा केला आहे की, वेळोवेळी नियम बदलून त्यांना स्पर्धेतून बाहेर ठेवण्यात आले. या आरोपामुळे स्पर्धेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रसंगी पथकाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, जर स्पर्धेत पराभव झाला असता तरी चाललं असतं, पण स्पर्धेपूर्वीच राजकीय हेतूने बाहेर काढणं हे अन्यायकारक आहे. गोविंदामध्ये राजकारण घुसवले जात आहे, ही परंपरेच्या विरोधात जाणारी गोष्ट आहे.
दरवर्षी गोविंदा स्पर्धांमध्ये ‘जय जवान’ पथकाचे प्रदर्शन उत्कृष्ट असते. त्यांच्या चढाया, समन्वय, आणि सादरीकरण यामुळे हे पथक नेहमीच चर्चेत राहिले आहे. त्यामुळे यंदा त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा सगळीकडे रंगली आहे. गोविंदा स्पर्धांमध्ये प्रामाणिकपणाची गरज असून, अशा गोष्टींमुळे नवोदित पथकांचं मनोबल खचू शकतं, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावरून व्यक्त केली जात आहे.
मुंबईसह राज्यभरातील गोविंदा पथकांसाठी प्रो गोविंदा स्पर्धा ही मोठी संधी असते. या स्पर्धेतून निवड होणाऱ्या पथकांना ना केवळ प्रतिष्ठा मिळते तर त्यांना आर्थिक आणि सामाजिक मान्यताही प्राप्त होते. त्यामुळे अशा पथकाला बाहेर ठेवणे हे गोविंदा क्षेत्रातील एक मोठे धक्का मानले जात आहे. यावर आयोजक काय स्पष्टीकरण देतात आणि पुढे काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्व गोविंदा प्रेमींचं लक्ष लागले आहे.