राज्यभर हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट बंद; करवाढीच्या निषेधार्थ ‘आहार’ संघटनेचा बंद
राज्यभर हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट बंद; करवाढीच्या निषेधार्थ ‘आहार’ संघटनेचा बंद
महाराष्ट्रात आज हॉटेल, बार, परमिट रूम्स बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या करवाढीच्या धोरणाविरोधात ‘आहार’ संघटनेचा एकदिवसीय बंद, ग्राहक आणि व्यवसायिक दोघांनाही फटका.
सायली मेमाणे
पुणे १४ जुलै २०२४ : आज महाराष्ट्रभर खाद्यप्रेमी आणि मद्यप्रेमींचा दिवस थोडा अडचणीचा ठरणार आहे. राज्यभरातील हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट्स आणि परमिट रूम्स एक दिवसासाठी बंद ठेवण्यात येत आहेत. यामागचे कारण म्हणजे राज्य सरकारने अलीकडेच लागू केलेली करवाढ. हॉटेल व्यवसायावर लादण्यात आलेल्या वाढीव परवाना शुल्क, उत्पादन शुल्क आणि जीएसटी धोरणांविरोधात महाराष्ट्र हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन अर्थात ‘आहार’ संघटनेने एकदिवसीय बंदची हाक दिली आहे.
हा बंद पूर्णपणे शांततेच्या मार्गाने करण्यात येणार असून, ग्राहक आणि प्रशासनाची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचे ‘आहार’ संघटनेने स्पष्ट केले आहे. परंतु या बंदमुळे छोट्या ते मोठ्या शहरांतील हजारो हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार बंद राहणार असल्यामुळे ग्राहकांना बाहेरून जेवण किंवा अॅक्शन्ससाठी आलेल्या पर्यटकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
व्यवसायिकांचे म्हणणे आहे की, कोविडमधून नुकतीच सावरलेली हॉटेल इंडस्ट्री अजूनही आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. अशा स्थितीत सरकारने उत्पादन शुल्क, परवाना नूतनीकरण शुल्क तसेच इतर सेवा करांमध्ये झालेली वाढ ही अव्यवहार्य आहे. यामुळे अनेक व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी, याविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी आजचा बंद आयोजित करण्यात आला आहे.
सर्वसामान्य ग्राहक, विशेषतः जे दररोज बाहेरून जेवण घेतात किंवा ऑफिसमध्ये कँटीनची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी काम करतात, त्यांच्यासाठी आजचा दिवस थोडा कठीण ठरणार आहे. तसेच पर्यटन हंगाम असल्यामुळे राज्यात आलेल्या पर्यटकांनाही याचा परिणाम जाणवणार आहे.
एकंदरीतच, हॉटेल उद्योगाने सरकारकडे मदतीची मागणी करत त्याच्या धोरणामध्ये बदल करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. जोपर्यंत सरकार या करवाढीचा पुनर्विचार करत नाही, तोपर्यंत आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.