प्रेग्नेन्सीदरम्यान कुटुंबाची मोठी चूक; फॉलिक अॅसिडच्या अभावामुळे विना डोक्याचं बाळ जन्माला
प्रेग्नेन्सीदरम्यान कुटुंबाची मोठी चूक; फॉलिक अॅसिडच्या अभावामुळे विना डोक्याचं बाळ जन्माला
गर्भावस्थेदरम्यान निष्काळजीपणामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. एका कुटुंबाच्या दुर्लक्षामुळे महिलेला विना डोक्याचं बाळ जन्माला आलं. डॉक्टरांनी फॉलिक अॅसिड आणि नियमित तपासणीचं महत्त्व अधोरेखित केलं आहे.
सायली मेमाणे
पुणे २८ ऑक्टोबर २०२५ : Pregnancy Mistake : गर्भावस्थेदरम्यान महिलांनी आपल्या आरोग्याची सर्वाधिक काळजी घेणे आवश्यक असते. या काळात प्रत्येक स्त्रीने योग्य आहार, नियमित तपासणी आणि डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करणं हे अत्यावश्यक आहे. परंतु काही वेळा कुटुंबातील निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या समजुतींमुळे अशा घटनांचा सामना करावा लागतो ज्या केवळ आईसाठी नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी धक्कादायक ठरतात. नुकत्याच अशाच एका प्रकरणात गर्भवती महिलेच्या कुटुंबाच्या चुकीमुळे तिचं बाळ विना डोक्याचं म्हणजेच Anencephaly या गंभीर विकारासह जन्माला आलं.
या घटनेबाबत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनिया गुप्ता यांनी सोशल मीडियावर माहिती शेअर केली आहे. त्यांनी सांगितलं की सहाव्या महिन्यापर्यंत गर्भातील बाळाचा डोक्याचा आणि मेंदूचा विकास व्हायला हवा. मात्र या महिलेमध्ये तो विकासच झाला नाही. डॉक्टरांनी तपासणी केली असता लक्षात आलं की महिलेनं मागील काही महिन्यांपासून कोणतीही सोनोग्राफी किंवा वैद्यकीय तपासणी केली नव्हती. डॉक्टरांनी विचारलं असता महिलेनं सांगितलं की तिला तपासणी करायची इच्छा होती, मात्र कुटुंबातील मंडळींनी “सर्व काही ठीक आहे, तपासणीची गरज नाही” असं सांगून तिला अडवलं.
या निष्काळजीपणामुळे महिलेला गंभीर परिणाम भोगावा लागला. सहाव्या महिन्यात गर्भातील बाळाचा डोक्याचा भाग तयारच झाला नव्हता. ही अवस्था Anencephaly म्हणून ओळखली जाते. या विकारात बाळाचा मेंदू आणि कवटीचा वरचा भाग विकसित होत नाही, त्यामुळे अशा अवस्थेत बाळ जिवंत राहू शकत नाही. डॉक्टरांच्या मते, ही समस्या प्रेग्नेन्सीच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये फॉलिक अॅसिडच्या कमतरतेमुळे उद्भवते.
फॉलिक अॅसिड हे गर्भधारणेच्या प्रारंभिक टप्प्यात बाळाच्या डोक्याचा आणि पाठीच्या कण्याचा विकास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पोषणतत्त्व आहे. गर्भधारणा झाल्यानंतर त्वरित फॉलिक अॅसिड घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र या प्रकरणात वेळेत औषध न घेतल्याने आणि तपासणी न केल्याने बाळात जन्मजात विकृती निर्माण झाली.
डॉ. गुप्ता यांच्या मते, गर्भवती महिलेच्या आरोग्याची जबाबदारी केवळ डॉक्टरांवर नाही, तर तिच्या कुटुंबावरही असते. कुटुंबातील सदस्यांनी “सर्व काही ठीक आहे” या गृहितकावर न चालता प्रत्येक महिन्यातील आवश्यक तपासणी करून घ्यायला हवी. गर्भवती महिलेची दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम संपूर्ण आयुष्यभर कायम राहू शकतात.
या घटनेतून प्रत्येक महिलेला आणि कुटुंबाला मोठा धडा मिळतो. गर्भावस्थेदरम्यान अगदी छोट्या दुर्लक्षामुळेही गंभीर अडचणी उद्भवू शकतात. त्यामुळे गर्भधारणा झाल्यानंतर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, नियमित तपासणी करा आणि फॉलिक अॅसिडसारखी आवश्यक औषधे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घ्या. तिसऱ्या महिन्यातील सोनोग्राफी अत्यावश्यक असून त्याद्वारे बाळाच्या आरोग्याचा आणि विकासाचा अंदाज घेतला जातो.
गर्भावस्थेतील आरोग्य हे आई आणि बाळ दोघांच्याही आयुष्याशी थेट जोडलेले असते. अशा वेळी कोणतंही दुर्लक्ष किंवा चुकीचा सल्ला टाळा. योग्य काळजी, योग्य आहार आणि वैद्यकीय सल्ल्यानेच निरोगी मातृत्वाचा अनुभव घेता येतो.