सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट; 7 वर्षांच्या नात्याचा शेवट एका पोस्टने केला जाहीर
सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट
ऑलिंपिक पदकविजेती सायना नेहवाल हिने पारुपल्ली कश्यपपासून घटस्फोट घेतला आहे. 7 वर्षांच्या वैवाहिक नात्यानंतर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर.
सायली मेमाणे
पुणे १४ जुलै २०२४ : भारतीय बॅडमिंटनमधील लोकप्रिय जोडी सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांच्या वैवाहिक नात्याचा शेवट झाला आहे. डिसेंबर 2018 मध्ये विवाहबद्ध झालेल्या या दोघांनी 7 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे. सायनाने तिच्या सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. तिने पोस्टमध्ये लिहिलं की, “आयुष्य कधी कधी आपल्याला वेगवेगळ्या मार्गांवर घेऊन जातं. खूप विचारविनिमयानंतर, पारुपल्ली कश्यप आणि मी परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी मानसिक स्थैर्य, शांती आणि वैयक्तिक विकासाला प्राधान्य देत आहोत.” तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सायना पुढे म्हणाली, “आम्ही एकत्र घालवलेल्या क्षणांबद्दल मी कृतज्ञ आहे. यावेळी आमच्या गोपनीयतेला समजून घेतल्याबद्दल आणि आमच्या भावनांचा आदर केल्याबद्दल धन्यवाद.” ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हैद्राबादमधील गोपीचंद अकादमीतून बॅडमिंटन कारकिर्दीची सुरुवात झालेल्या सायना आणि कश्यप यांनी बऱ्याच स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. सायनाने ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक पटकावलं असून ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे जिने हे यश मिळवलं. दुसरीकडे, पारुपल्ली कश्यपने 2014 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. 2024 च्या सुरुवातीला कश्यपने स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली होती. गेल्या वर्षभरापासून सायना बॅडमिंटनपासून दूर आहे. 2023 मध्ये सिंगापूर ओपनच्या पहिल्या फेरीत झालेल्या पराभवानंतर ती कोणत्याही स्पर्धेत सहभागी झालेली नाही. 2023 च्या शेवटी एका पॉडकास्टमध्ये तिने संधिवाताच्या त्रासाबद्दल आणि निवृत्तीच्या शक्यतेबद्दल खुलेपणाने बोलले होते. सायना नेहवाल ही भारतीय बॅडमिंटन क्षेत्रातील क्रांतिकारक मानली जाते. ती जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी पहिली भारतीय महिला असून BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू आहे. तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाचा आदर राखत तिच्या आणि कश्यपच्या या निर्णयाला चाहत्यांनी संयमाने घेतले पाहिजे.