‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर वाद | मुख्यमंत्र्यांच्या भाषणात आंदोलन, कार्यक्रमात गोंधळ
‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर वाद | मुख्यमंत्र्यांच्या भाषणात आंदोलन, कार्यक्रमात गोंधळ
‘खालिद का शिवाजी’ या वादग्रस्त चित्रपटावर राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात जोरदार विरोध; मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी. आंदोलकांकडून ‘इतिहासाचं विकृतीकरण थांबवा’ची मागणी.
सायली मेमाणे
मुंबई ६ ऑगस्ट २०२५ : मुंबई : राज्य चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘खालिद का शिवाजी’ (Khalid Ka Shivaji) या वादग्रस्त चित्रपटावरून राजकारण तापलं आहे. या चित्रपटाच्या विरोधात दोन आंदोलकांनी थेट कार्यक्रमात घोषणाबाजी केली आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान गोंधळ घातला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असताना हे दोन आंदोलक अचानक उठले आणि जोरदारपणे “इतिहासाचं विकृतीकरण थांबवा!” अशा घोषणांनी वातावरण तापवलं. कार्यक्रम काही क्षणांसाठी थांबवावा लागला आणि सुरक्षेचे अधिकारी तत्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना कार्यक्रमस्थळी बाहेर काढण्यात आलं.
मुख्यमंत्र्यांनी अत्यंत संयम राखत प्रतिक्रिया दिली. त्यांनी आंदोलकांना उद्देशून सांगितले, “तुमचं म्हणणं ऐकलं, पण कार्यक्रम बिघडवू नका.” अशा शब्दांत त्यांनी गोंधळ थांबवण्याचं आवाहन केलं.
हा प्रकार घडल्यामुळे ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाच्या विरोधातील वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी याआधीही या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला होता. इतिहासातील महापुरुषांच्या प्रतिमांचं विकृतीकरण केलं जात असल्याचा आरोप करत, या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे.
या घटनेमुळे राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावरही #KhalidKaShivaji आणि #BanDistortedCinema हे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आले आहेत.
राज्य सरकारकडून अद्याप अधिकृत निर्णय किंवा कारवाई जाहीर झालेली नसली तरी, चित्रपटाचे प्रदर्शन आणि त्यावरील प्रतिक्रिया लक्षात घेता भविष्यात यावर अधिक तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात.