कुलाबा मनपा शाळा महिन्याभरापासून बंद; 2000 विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात

कुलाबा मनपा शाळा महिन्याभरापासून बंद; 2000 विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात
कुलाबा येथील महापालिकेची शाळा इमारत धोकादायक असल्याने महिनाभरापासून बंद; 2000 विद्यार्थी शिक्षणापासून वंचित, पालकांत प्रचंड संताप.
सायली मेमाणे
पुणे ६ ऑगस्ट २०२५ : मुंबईच्या कुलाबा परिसरात असलेल्या मुंबई महानगरपालिका शाळेची अवस्था सध्या चिंताजनक झाली आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेची ही शाळा गेल्या एक महिन्यापासून बंद असून, यामध्ये शिकणाऱ्या 2000 विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी झाले आहे.
इमारत धोकादायक असल्याने शाळा तात्काळ बंद करण्यात आली, मात्र त्याआधी कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता अचानक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही शाळा मुंबईच्या उच्चभ्रू भागात, कुलाबा येथे आहे, जे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मतदारसंघ आहे. शाळेची स्थापना 1964 साली झाली होती. ती आजतागायत हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देत होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज ती मोडकळीस आलेली असून शिक्षणात अडथळा ठरत आहे.
सध्या पालकांमध्ये संतापाची लाट आहे आणि अनेकांनी सार्वजनिकरित्या तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिक्षणाचा हक्क नाकारल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना घरी बसवण्याची ही पद्धत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेत असताना पर्यायी ठिकाणाची योजना का केली नाही, असा सवाल उपस्थित होतो. 2000 पैकी फक्त 200 विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश घेतला असून उर्वरित विद्यार्थ्यांसाठी अजूनही कोणतीही ठोस पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही.
स्थानिक अधिकाऱ्यांनी 16 ते 22 लाख रुपयांपर्यंतच्या भाड्याच्या इमारती पाहिल्या, मात्र अद्याप निर्णय झाला नाही. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शाळेची पाहणी केली असून लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुरूच आहे.
मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे हे अपयश असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केल्याचा आरोप समाजमाध्यमांवर जोर धरतो आहे. ही केवळ इमारतीची बाब नसून, ही संपूर्ण प्रणालीतील हलगर्जीपणाची साक्ष आहे. या परिस्थितीत एक गोष्ट स्पष्ट होते — शिक्षणासाठी पैशाची कमतरता नसलेली महापालिका जर शाळा चालवू शकत नसेल, तर ती संपत्ती नेमकी कुणासाठी आणि कशासाठी वापरली जाते, यावर गंभीर प्रश्न उपस्थित होतो.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter