ठाण्यात प्रेमसंबंधातून संतापजनक घटना; १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीस पेटवून दिलं, मुलगी गंभीर भाजली
ठाण्यात प्रेमसंबंधातून संतापजनक घटना; १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीस पेटवून दिलं, मुलगी गंभीर भाजली
ठाण्यातील कापूरबावडी परिसरात १७ वर्षीय मुलाने वादाच्या भरात मैत्रिणीस पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी ८० टक्के भाजली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.
सायली मेमाणे
पुणे २८ ऑक्टोबर २०२५ : ठाणे : शहरातील कापूरबावडी परिसरात एका १७ वर्षीय मुलाने वादाच्या भरात आपल्या मैत्रिणीस पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पीडित मुलगी सध्या ८० टक्के भाजल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत आहे. कापूरबावडी पोलिसांनी या प्रकरणात आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या कुटुंबासह राहते. यापूर्वी ती कुटुंबासोबत मुंबईतील चेंबूर भागात राहत होती. तेथीलच एका १७ वर्षीय मुलासोबत तिची ओळख झाली होती आणि दोघांमध्ये काही काळ मैत्रीचे संबंध होते. काही दिवसांपूर्वी मुलगी भाऊबीज निमित्ताने चेंबूर येथे गेली असता दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी मुलाने मुलीला मारहाण केली आणि तिच्या नातेवाईकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने “तिला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली होती.
या घटनेनंतर मुलगी खूप घाबरली होती. ती आपल्या ठाण्यातील घरी परतली होती. मात्र २४ ऑक्टोबर रोजी, ती घरी एकटी असताना अचानक तिच्या घरातून धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांनी पाहिले. त्यांनी तात्काळ तिच्या आईला याची माहिती दिली. घरात धाव घेतल्यावर तिचे कुटुंबीय पाहतात तो तिचा मित्र घरातच होता आणि मुलगी भाजलेल्या अवस्थेत ओरडत होती. तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर मुलीच्या आईने कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम १०९ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, दोघांमध्ये आधीपासूनच ओळख होती आणि काही दिवसांपासून वाद सुरू होते. मुलीच्या प्रकृतीत स्थिरता आल्यावर तिचा जबाब घेतल्यानंतर घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
या घटनेनंतर ठाणे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्पवयीनांमधील प्रेमसंबंधातून निर्माण होणाऱ्या अशा हिंसक घटनांनी पुन्हा एकदा समाजमन हादरले आहे. मानसिक अस्थिरतेमुळे किंवा तणावाच्या क्षणी घेतलेले टोकाचे निर्णय किती गंभीर परिणाम घडवू शकतात, याचा हा प्रकार आणखी एक भयावह उदाहरण ठरतोय.