डिग्गी गावात रसायन मिश्रित सिंधी पिल्याने तरुणाचा मृत्यू; दोन दिवसांपासून होता गायब
डिग्गी गावात रसायन मिश्रित सिंधी पिल्याने तरुणाचा मृत्यू; दोन दिवसांपासून होता गायब
धाराशिव जिल्ह्यातील डिग्गी गावात दोन दिवसांपासून गायब असलेल्या 24 वर्षीय अजय डिग्गीकर या युवकाचा मृतदेह नाल्यात सापडला. रसायन मिश्रित सिंधी पिल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप असून गावकऱ्यांनी अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे.
सायली मेमाणे
पुणे १८ ऑक्टोबर २०२५ : धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील डिग्गी गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अजय गोपीचंद डिग्गीकर (वय 24) या युवकाचा मृतदेह गावातील नाल्यात सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक आमदार प्रवीण स्वामी यांच्या मतदारसंघातील या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नातेवाईकांच्या माहितीनुसार, अजय डिग्गीकर दोन दिवसांपूर्वी घरातून बाहेर गेला होता. मात्र त्यानंतर त्याचा काहीच पत्ता लागला नव्हता. गावातील काही युवकांना सकाळी नाल्यात मृतदेह दिसल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
प्राथमिक तपासात अजयने रसायन मिश्रित सिंधी पिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नातेवाईकांनी थेट आरोप करत म्हटलं की, “अजयचा मृत्यू अपघाती नाही. गावात सुरू असलेल्या काही अवैध धंद्यांमुळे ही घटना घडली आहे.” त्यांनी पोलिस प्रशासनाकडे अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे.
डिग्गी गावात मागील काही महिन्यांपासून अवैध रसायन आणि सिंधी विक्रीसंदर्भात तक्रारी होत आहेत. गावकऱ्यांनी अनेकदा या बाबत स्थानिक प्रशासनाला कळवलं होतं, परंतु कारवाई न झाल्याचा आरोप आता जोर धरत आहे. अजयच्या मृत्यूनंतर गावातील नागरिकांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला आणि पोलिस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली.
या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून तरुणाच्या मृत्यूमुळे डिग्गी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
गावकऱ्यांच्या मते, अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून गावातील सर्व अवैध सिंधी विक्री आणि रसायनमिश्रित पदार्थांच्या विक्रीवर कठोर बंदी घालण्याची गरज आहे. प्रशासनाने तातडीने छापा टाकून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
या घटनेने धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांमध्ये सुरक्षा आणि आरोग्याविषयी चिंता वाढली आहे. तरुणांच्या जीवाशी खेळणाऱ्या या अवैध धंद्यांना आळा बसावा, यासाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.