‘धनुष्य बाण’ कुणाचा? उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला ‘सुप्रीम’ सुनावणी
‘धनुष्य बाण’ कुणाचा? उद्धवसेना की शिंदेसेना?
‘धनुष्य बाण’ चिन्हावरून उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील वाद सर्वोच्च न्यायालयात; अंतिम निर्णय १६ जुलै रोजी होणार.
सायली मेमाणे
पुणे ३ जुलै २०२५ : शिवसेनेच्या ‘धनुष्य बाण’ चिन्हावरून सुरू असलेला राजकीय संघर्ष पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धसास लागण्याच्या मार्गावर आहे. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी निवडणूक आयोगाने शिवसेनेचं अधिकृत चिन्ह ‘धनुष्य बाण’ एकनाथ शिंदे गटाला दिलं होतं. या निर्णयाविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. हे प्रकरण गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित आहे.
२ जुलै २०२५ रोजी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे या प्रकरणाची तातडीने सुनावणी व्हावी, अशी मागणी केली. मात्र न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या अध्यक्षतेखालील सुट्टीतील खंडपीठाने ही मागणी फेटाळून लावत १६ जुलै रोजी नियमित खंडपीठासमोर प्रकरण मांडण्याचा सल्ला दिला.
शिंदे गटाच्या वतीने सुनावणीला विरोध करताना सांगण्यात आलं की, आयोगाच्या निर्णयानंतर दोन मोठ्या निवडणुका — लोकसभा व विधानसभा — पार पडल्या आहेत. त्यामुळे चिन्हाच्या मुद्यावर आता तातडीने सुनावणीची आवश्यकता नाही. यापूर्वी ७ मे २०२५ रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने देखील उद्धवसेनेची हीच मागणी फेटाळली होती.
उद्धव ठाकरे गटाने मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमधील शरद पवार व अजित पवार यांच्यातील चिन्ह वादाच्या प्रकरणाचा दाखला दिला. त्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने लवकर सुनावणी घेतली होती. त्यामुळे त्याच न्यायमान्यतेनुसार आमच्या प्रकरणाचीही सुनावणी घ्यावी, असा युक्तिवाद उद्धवसेनेच्या वकिलांनी केला. यावर खंडपीठाने स्पष्टपणे सांगितलं की, तुम्ही तुमचा मुद्दा १६ जुलै रोजी नियमित खंडपीठासमोर मांडा.
‘धनुष्य बाण’ हे शिवसेनेचं मूळ आणि ऐतिहासिक चिन्ह असून त्यावरचा दावा दोन्ही गटांनी ठेवला आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला आयोगाने मान्यता दिली आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा गट अजूनही या चिन्हासाठी संघर्ष करत आहे. या खटल्याचा निकाल केवळ चिन्हापुरता मर्यादित न राहता राज्यातील राजकीय सत्तासमीकरणांवरही मोठा परिणाम करू शकतो.
१६ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयातील नियमित खंडपीठासमोर या खटल्यावर सुनावणी होणार असून, दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. ही सुनावणी ठरवेल की, शिवसेनेचं मूळ चिन्ह अखेर कुणाच्या नावावर राहणार — उद्धवसेना की शिंदेसेना?