पुणे-मुंबईसह नाशिक, सातारा, कोल्हापूरमध्ये गारठ्याचा जोर; तापमानात मोठी घसरण
पुणे-मुंबईसह नाशिक, सातारा, कोल्हापूरमध्ये गारठ्याचा जोर; तापमानात मोठी घसरण
उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या आगमनामुळे पुणे, मुंबई, नाशिक, सातारा आणि कोल्हापूरमध्ये तापमानात घट; पहाटे धुक्याची चादर आणि गारठा जाणवू लागला.
सायली मेमाणे
पुणे १८ नोव्हेंबर २०२५ : राज्यातील हवामानात मोठा बदल जाणवत असून गेल्या दोन दिवसांत तापमानात अचानक घसरण झाल्याने पुणे, मुंबई, नाशिक, सातारा, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुलाबी थंडीचा जोर वाढला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे रात्रीचे किमान तापमान सरासरीपेक्षा खाली नोंदवले जात आहे. विशेषतः पहाटे आणि रात्रीच्या वेळी वातावरणात कमालीचा गारठा जाणवत असून, काही भागात हलक्या धुक्याची चादरही पसरलेली दिसत आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, मध्य भारतावर पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव कमी झाल्यानंतर उत्तरेकडील थंड हवा वेगाने दक्षिणेकडे सरकू लागली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तापमानात मोठी घसरण नोंदवली जात आहे. पुण्यातील काही भागांत किमान तापमान १२ ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले जात आहे. विशेषतः वारजे, खडकवासला, पाषाण, बाणेर, सिंहगड रस्ता या भागांत गारठा अधिक जाणवत आहे.
मुंबई महानगरातही तापमानात किंचित घट झाली असून, उपनगरांत सकाळच्या वेळी थंड वारे जाणवू लागले आहेत. थंडी फारशी प्रकर्षाने जाणवत नसली तरी आर्द्रतेमध्ये घट आणि तापमानातील घसरण यामुळे मुंबईतही हिवाळ्याची चाहूल स्पष्ट झाली आहे.
नाशिकचा गारठा नेहमीच राज्यात आघाडीवर असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे किमान तापमान १० ते १२ अंशांदरम्यान खाली आले आहे. द्राक्षबागायतदारांनी या बदलत्या हवामानावर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. सकाळच्या सत्रात नाशिक शहर आणि ग्रामीण भागात घनदाट धुके पसरल्याने वाहतूकही मंदावली आहे.
कोल्हापूर-सातारा पट्ट्यातील थंडीही वाढली असून, याठिकाणी पहाटेचा तापमानात अचानक घट जाणवत आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर, पाचगणी, कास पठार या पर्यटनस्थळांवर थंडीचे प्रमाण विशेष वाढले आहे. महाबळेश्वरमध्ये तापमान १० अंशांच्या आसपास स्थिरावत असल्याचे निरीक्षणात आले आहे.
अचानक वाढलेल्या या थंडीमुळे नागरिकांनी गरम कपड्यांचा वापर सुरू केला आहे. सकाळी चालणे, धावणे किंवा व्यायाम करणाऱ्यांमध्ये या बदलत्या तापमानाचा मोठा परिणाम जाणवतो आहे. रुग्णालयांतही सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांनी काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस राज्यात थंडीचे प्रमाण कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईत तापमानात फारसा बदल होणार नसला तरी पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूरमध्ये तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. तब्बल आठवडाभर हवामान कोरडे राहील आणि रात्रीच्या वेळी पारा खाली उतरेल, असेही हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
या अचानक पर्यावरणीय बदलामुळे सर्वसामान्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. गरम पाणी पिणे, गरम कपडे वापरणे, रात्री उशिरा बाहेर पडणे टाळणे आणि लहान मुलांना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. वाहतूकदारांसाठीही सकाळच्या धुक्यात वाहन सावधगिरीने चालवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.