महाराष्ट्रात देशातील तिसरे सर्वात मोठे IT पार्क सोलापूरमध्ये; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
महाराष्ट्रात देशातील तिसरे सर्वात मोठे IT पार्क सोलापूरमध्ये; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
सोलापूरमध्ये महाराष्ट्राचे दुसरे आणि देशाचे तिसरे सर्वात मोठे IT पार्क उभारले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानसेवेच्या उद्घाटन प्रसंगी ही घोषणा केली.
सायली मेमाणे
पुणे १८ ऑक्टोबर २०२५ : सोलापूर – पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कनंतर आता महाराष्ट्रातील दुसरे आणि देशातील तिसरे सर्वात मोठे आयटी पार्क सोलापूरमध्ये उभारले जाणार आहे. हे घोषणा १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू विमानसेवेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
हिंजवडी आयटी पार्क हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे आयटी पार्क असून, येथे अनेक परदेशी कंपन्यांची कार्यालये कार्यरत आहेत. परंतु जागेच्या कमतरतेमुळे नवीन कंपन्यांना प्रवेश देणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये नवीन IT पार्क उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “सोलापूरचे विमानतळ कार्यान्वित झाल्याने लवकरच सोलापूरला आयटी पार्क उभारण्यात येईल. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल.”
सोलापूर आयटी पार्कसाठी सध्या कुंभारी औद्योगिक वसाहत शहरापासून ८-१० किलोमीटर अंतरावर प्रस्तावित आहे. येथे सुमारे ९६४ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्याचा विचार आहे. त्यासाठी आधीच २४ कोटी रुपयांची मागणी केली होती, जी शासनाच्या कार्यालयात प्रलंबित होती. आता हा प्रस्ताव पुन्हा सादर करून अंतिम निर्णय लवकरात लवकर घेतला जाणार आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निर्देशानुसार MIDC अधिकाऱ्यांना जमिनीचा शोध घेऊन प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोलापूर-पुणे आणि सोलापूर-विजापूर महामार्गाजवळील शासकीय तसेच खासगी जमीनसुद्धा आयटी पार्कसाठी तपासली जाणार आहे.
नवीन आयटी पार्क उभारल्यास सोलापूर शहर आयटी हब म्हणून उदयास येईल. स्थानिक तरुणांना शहराच्या बाहेर स्थलांतर न करता स्थानिक पातळीवर रोजगार मिळेल. तसेच, हिनजवडीतील जागेच्या अभावामुळे बाह्य कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी सोलापूर एक पर्यायी हब बनेल.
आयटी पार्कमध्ये अद्याप विशिष्ट कंपन्यांची घोषणा झालेली नाही, परंतु एनटीपीसीकडून सबसिडी दराने वीज पुरवठा होईल. नवीन IT पार्कमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, रोजगारनिर्मिती वाढेल आणि महाराष्ट्रातील आयटी उद्योग क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील.