राज ठाकरे यांनी फडणवीसांची भेट; मुंबईतील वाहतूक आणि पार्किंग समस्यांवर चर्चा
राज ठाकरे यांनी फडणवीसांची भेट; मुंबईतील वाहतूक आणि पार्किंग समस्यांवर चर्चा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुंबईतील वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या आणि शहराच्या सुनियोजित विकासावर प्रेझेंटेशन दिले.
सायली मेमाणे
पुणे २१ ऑगस्ट २०२५ : मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली आणि मुंबईतील वाहतूक व पार्किंग समस्यांवर सविस्तर चर्चा केली. बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलला पराभव झाल्यानंतर या भेटीने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा उधळली, पण राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की ही भेट राजकीय नव्हे, तर शहराच्या पायाभूत सुविधा आणि वाहतूक सुधारण्याच्या मुद्द्यावर केंद्रित होती.
राज ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना शहरातील वाहतूक परिस्थिती आणि पार्किंग समस्यांवर प्रेझेंटेशन दिले. ट्रॅफिकची परिस्थिती दाखवा, मी तुम्हाला देशाचं भविष्य सांगतो.” शहरातील अनधिकृत बांधकाम आणि लोकसंख्येच्या वाढीमुळे वाहतूक व पार्किंगची समस्या वाढत आहे. जिथे पूर्वी 50 लोक राहत होते, तिथे आता 500 लोक राहत आहेत, त्यामुळे रस्ते कमी पडत आहेत, वाहने आणि माणसे रस्त्यावर वाढत आहेत, असेही त्यांनी अधोरेखीत केले.
राज ठाकरे यांनी ‘स्मार्ट पार्किंग’ योजनेचा प्रस्ताव मांडला. यामध्ये छोटी मैदाने गाड्यांसाठी वापरणे, फुटपाथ रंगाने विभागणे आणि पार्किंग नियमांचे पालन सुनिश्चित करणे यावर भर देण्यात आला आहे. तसेच डबल पार्किंग आणि नो पार्किंगच्या समस्या दूर करण्यासाठी टेक्नॉलॉजी वापरण्याचेही त्यांनी सुचवले.
राज ठाकरेंचे म्हणणे आहे की, शहरांचा योग्य आराखडा आताच आखणे अत्यावश्यक आहे; अन्यथा काही वर्षांनी या समस्यांचा हाताबाहेर जाण्याचा धोका आहे. शहरातील शिस्त राखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.