राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचे माजी आमदार राजन पाटलांना थेट आव्हान; “माझा पराभव झाला तर मी राजकारण सोडेन”
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचे माजी आमदार राजन पाटलांना थेट आव्हान
नरखेडमधून लढण्याची घोषणा करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी माजी आमदार राजन पाटलांना थेट आव्हान दिले. “माझा पराभव झाला तर मी राजकारण सोडेन,” असा इशारा त्यांनी दिला.
सायली मेमाणे
पुणे १८ ऑक्टोबर २०२५ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राजकारणात आता थेट संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांना थेट सार्वजनिक आव्हान दिले आहे. “मी माझा नरखेड गट सोडून जिल्हा परिषदेसाठी लढतो, तुम्ही अनगर सोडून माझ्या विरोधात लढा,” असे खुले आव्हान देत उमेश पाटील यांनी आगामी निवडणुकीत थेट टक्कर देण्याचे संकेत दिले आहेत.
उमेश पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जर माझा पराभव झाला, तर मी माझं राजकारण कायमचं सोडून देईन.” त्यांच्या या विधानामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.
ते पुढे म्हणाले, “मी अनगर गावात गेल्यावर माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला, पण ‘अपने गली में कुत्ता भी शेर होता है,’ अशी भाषा वापरून माझा अवमान करण्यात आला.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार गटातील नेत्यांनी उमेश पाटील यांच्या पाठीशी उभे राहत त्यांना समर्थन दिलं आहे. या आव्हानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील मतभेद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
राजन पाटील हे माजी आमदार म्हणून राजकारणात अनुभवी मानले जातात, तर उमेश पाटील यांनी गेल्या काही वर्षांत संघटनात मजबूत पकड निर्माण केली आहे. त्यामुळे हा सामना राजकीय प्रतिष्ठेचा बनणार असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये या संघर्षाबद्दल उत्सुकता वाढली आहे. उमेश पाटील यांच्या या आव्हानामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील आगामी निवडणुकीची रणधुमाळी रंगतदार होण्याचे निश्चित झाले आहे.