वसईत संताप: शिक्षिकेच्या क्रूर शिक्षेमुळे सहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू? अनधिकृत शाळेवर गंभीर आरोप
वसईत संताप: शिक्षिकेच्या क्रूर शिक्षेमुळे सहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू? अनधिकृत शाळेवर गंभीर आरोप
वसई सातिवलीतील श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेत 12 वर्षीय काजल गौंडचा मृत्यू. 5 मिनिटे उशीर झाल्याने शिक्षिकेने 100 उठाबशा काढायला लावल्याचा आरोप; अनधिकृत शाळांवरही प्रश्नचिन्ह.
सायली मेमाणे
१६ नोव्हेंबर २०२५ : वसई पूर्वेकडील सातिवली परिसरात एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेत शिकणाऱ्या सहावीच्या विद्यार्थिनी काजल गणेश गौंड (वय 12) हिच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि शोककळा पसरली आहे. काजलच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार, केवळ शाळेत 5 मिनिटे उशीर झाल्यामुळे एका महिला शिक्षिकेने तिला अमानवी आणि क्रूर अशी शिक्षा दिली. या शिक्षेमुळे काजलची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप समोर आला आहे.
काजलच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 8 नोव्हेंबर 2025 रोजी काजल काही मिनिटे उशिरा शाळेत पोहोचली होती. याच कारणावरून संबंधित शिक्षिकेने तिच्या पाठीवर दप्तर असतानाच 100 हून अधिक उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. सततच्या उठाबशांमुळे तिच्या पाठी, कंबरेच्या खालच्या भागात आणि शरीरभर तीव्र वेदना होऊ लागल्या. घरी परतल्यानंतरही तिची तब्येत अधिकच बिघडत गेली. वेदना असह्य झाल्यावर तिला नालासोपारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र तिची प्रकृती झपाट्याने खालावत गेल्याने तिला पुढील उपचारांसाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. तेथेही अनेक तास उपचार सुरू असताना काजलने अखेरचा श्वास घेतला. या दुर्दैवी घटनेने कुटुंबीय, स्थानिक रहिवासी आणि पालक वर्ग पूर्णपणे हादरून गेले आहेत. एका क्षुल्लक कारणावरून मुलीवर इतकी कठोर शिक्षा लागू केल्याचा आरोप होत असून, या क्रूर वर्तनाविरोधात लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
घटनेनंतर पालकांनी शाळा प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिक्षिकेची ही शिक्षा अमानवी असल्याचे सांगत नागरिकांनी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. स्थानिक पोलिसांनीही या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू केली असून कुटुंबियांनी दिलेला जबाब नोंदवला आहे.
या प्रकरणासोबतच श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेतील अनियमितता, मान्यतेचा अभाव आणि इमारतीच्या अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यांनाही वेग आला आहे. प्राप्त माहितीनुसार, या शाळेला केवळ आठवीपर्यंतची मान्यता असूनही येथे दहावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. शाळेची इमारतही अनधिकृत असल्याचा आरोप समोर येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचे पालकांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
वसई तालुक्यात सुमारे 97 अनधिकृत शाळा चालत असल्याची माहिती शिक्षण विभागानेच दिली आहे. त्यापैकी 69 प्राथमिक तर 28 माध्यमिक शाळा आहेत. विभागाकडे या शाळांची यादी असूनही योग्य कारवाई न झाल्याने अशा प्रकारच्या धोकादायक घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनधिकृत शाळांमध्ये शिक्षकांची पात्रता, इमारतींची सुरक्षितता, स्वच्छता आणि शैक्षणिक दर्जा यांची कोणतीही प्रभावी तपासणी होत नसल्याने मुलांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
काजलच्या मृत्यूनंतर संपूर्ण परिसर संतापाने पेटला आहे आणि नागरिकांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधित शिक्षिका, शाळा प्रशासन आणि अनधिकृत शैक्षणिक व्यवस्थांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. एक निरागस जीव वाचवण्यात अपयशी ठरलेल्या व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्याची ही वेळ असल्याचे अनेकांनी सांगितले आहे.