विदर्भ वेगळा होणार का? उद्धव ठाकरे यांचे जोरदार विधान, महाराष्ट्राच्या अखंडतेवर मोठी भाष्य

0
विदर्भ वेगळा होणार का? उद्धव ठाकरे यांचे जोरदार विधान, महाराष्ट्राच्या अखंडतेवर मोठी भाष्य

विदर्भ वेगळा होणार का? उद्धव ठाकरे यांचे जोरदार विधान, महाराष्ट्राच्या अखंडतेवर मोठी भाष्य

उद्धव ठाकरे यांनी विदर्भ राज्याची मागणी फेटाळली. “महाराष्ट्र आणि विदर्भ अविभाज्य आहेत,” असे ते म्हणाले. विदर्भ–विभाजनाच्या चर्चेतूनच हिवाळी अधिवेशनात तापलेले राजकारण.

पुणे १२ डिसेंबर २०२५ : राज्यातील हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू असून, यावेळी पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाच्या मागणीने राजकारणात खळबळ उडवली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी जोरात मांडली होती. त्यांच्या मते, विदर्भातील विकासाचा अनुशेष भरून काढणे हे एकट्या महाराष्ट्र शासनाला शक्य नाही आणि या भागात ओबीसी, दलित, आदिवासी व अल्पसंख्याक समाजांचे प्राबल्य असूनही त्यांना सत्तेत न्याय्य प्रतिनिधित्व मिळत नाही. या वक्तव्याने राज्यभरात वेगळ्या विदर्भाविषयीची चर्चा पुन्हा पेटली.

यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण वादाला कडवे उत्तर दिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की “वेगळा विदर्भ होऊ शकत नाही; वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होणारच नाही. महाराष्ट्र हा विदर्भाचा आहे आणि विदर्भ महाराष्ट्राचा आहे.” त्यांच्या या विधानाने राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

उद्धव ठाकरे यांनी पुढे सरकारवर टीका करत विचारले की, “राज्य सरकारने स्पष्ट सांगावे की ते महाराष्ट्र अखंड ठेवू इच्छितात की महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत?” त्यांनी विदर्भाच्या प्रश्नांवर लक्ष वेधताना म्हटले की, विदर्भातील लोकांच्या समस्या, प्रलंबित विकास प्रकल्प व पायाभूत सुविधांवरील अडथळे यावर सरकारने ठोस भूमिका जाहीर करावी. वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या नेत्यांनी आतापर्यंतच्या अधिवेशनात नेमके कोणते प्रश्न उपस्थित केले, हे जनतेसमोर यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

सध्या राज्याचे मुख्यमंत्री आणि अनेक महत्त्वाचे मंत्री हे विदर्भातील असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विदर्भावर अन्याय होत असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा हा महाराष्ट्राच्या अखंडतेच्या मुळावर घाव घालणारा प्रकार आहे आणि जो कोणी महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करेल, तो महाराष्ट्राचा हितचिंतक नसल्याचे त्यांनी कठोर शब्दांत नमूद केले.

दरम्यान, त्यांनी आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले. विरोधी पक्षनेते पदासाठी विधिमंडळात अद्याप निर्णय न घेण्यात आल्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की दोन्ही सभापतींनी या विषयावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. विरोधी पक्षनेता नसल्याने सभागृहात जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे कठीण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरे यांच्या विधानामुळे विदर्भ विभाजनाच्या चर्चेला तात्पुरता ब्रेक बसला असला तरी राजकीय वर्तुळात यावर पुढील काही दिवस मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे. विदर्भाचा विकास, प्रादेशिक असंतोष आणि राजकीय समीकरणे या सर्व घटकांच्या पाश्र्वभूमीवर हा मुद्दा आगामी काळात अधिक गती घेणार हे निश्चित आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *