संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर ७ दिवसांनी अंत्यसंस्कार आज दिल्लीमध्ये; विलंबामागचं कारण समोर
संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर ७ दिवसांनी अंत्यसंस्कार
लंडनमध्ये मृत्यू झालेल्या संजय कपूर यांच्यावर आज दिल्लीतील लोधी रोडवर अंत्यसंस्कार होणार; अमेरिकन नागरिकत्वामुळे विलंब.
सायली मेमाणे
दिल्ली १९ जून २०२५ : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर यांचे माजी पती आणि उद्योजक संजय कपूर यांचं १२ जून रोजी लंडनमध्ये निधन झालं. केवळ ५३ वर्षांचे असताना पोलो खेळताना मधमाशी तोंडात गेल्यानंतर तीव्र श्वासोच्छवासाचा त्रास झाल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. आज, १९ जून रोजी त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीत संध्याकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
संजय कपूर यांच्याकडे अमेरिकेचं नागरिकत्व असल्यामुळे त्यांच्या पार्थिव भारतात आणण्यात प्रशासनिक आणि कायदेशीर प्रक्रिया लागली. याच कारणामुळे त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल सात दिवसांनी अंत्यसंस्कार होत आहेत. एनडीटीव्हीच्या माहितीनुसार, त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती अधिकृतपणे दिली आहे.
संजय कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडसह उद्योजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा विवाह २००३ मध्ये झाला होता. मात्र काही वर्षांनी हे लग्न विभक्त झालं. या दोघांना दोन मुलं असून घटस्फोटानंतर मुले करिश्मा कपूरसोबत राहत आहेत.
संजय कपूर यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन येत्या २२ जून २०२५ रोजी करण्यात आले आहे. दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये दुपारी ४ ते ५ या वेळेत ही सभा होईल. कुटुंबीय, मित्रमंडळी आणि बॉलिवूडमधील अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
संजय कपूर यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, या प्रसंगात अनेकांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर पार्थिव भारतात आणण्यासाठी लागलेल्या वेळेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले, मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विलंब अटळ होता, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz
1 thought on “संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर ७ दिवसांनी अंत्यसंस्कार आज दिल्लीमध्ये; विलंबामागचं कारण समोर”