23 नोव्हेंबरला TET परीक्षा; कार्यरत शिक्षकांनाही अनिवार्य परीक्षा देताना लागणार बुद्धीमत्तेचा कस
23 नोव्हेंबरला TET परीक्षा; कार्यरत शिक्षकांनाही अनिवार्य परीक्षा देताना लागणार बुद्धीमत्तेचा कस
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यरत शिक्षकांना 23 नोव्हेंबरला होणारी TET परीक्षा देणे अनिवार्य झाले आहे. शिक्षकांच्या पुढील भरती प्रक्रियेवर निकालाचा थेट परिणाम होणार असल्याने तयारीला वेग. टेट परीक्षा फेब्रुवारीत.
६ ऑक्टोबर २०२५ : राज्यातील शिक्षकांसाठी येणारा 23 नोव्हेंबर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यरत शिक्षकांना आता शिक्षक पात्रता परीक्षा, म्हणजेच TET देणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे हजारो शिक्षक आणि इच्छुक उमेदवार सध्या अभ्यासात गुंतले असून आगामी परीक्षेच्या तयारीला मोठा वेग आला आहे. दिवाळी सुट्टी संपताच शिक्षकांनी पुन्हा अभ्यास, टेस्ट सीरीज, ऑनलाईन क्लासेस आणि नोट्स तयार करण्यास सुरुवात केली आहे. शाळेतील दैनंदिन कामकाज आटोपल्यावर रात्री उशिरापर्यंत तयारी करण्याची वेळ अनेकांवर आली आहे.
ही परीक्षा शिक्षकांच्या पुढील भरती प्रक्रियेवर थेट परिणाम करणार असल्याने शिक्षक वर्गात चिंता आणि ताण निर्माण झाला आहे. ‘गुरुजींची परीक्षा’ म्हणून ओळखली जाणारी ही चाचणी केवळ पात्रता नाही तर त्यांच्या अध्यापन क्षमतेची, बुद्धीमत्तेची आणि शैक्षणिक सक्षमता तपासणारी महत्त्वपूर्ण चौकट ठरणार आहे. गेल्या वर्षी गडचिरोलीचा टीईटी निकाल समाधानकारक नव्हता. यावर्षी परीक्षेसाठी बसणाऱ्यांची संख्या वाढलेली असल्याने निकालात सुधारणा होते का, याकडे शिक्षण विभागाचे विशेष लक्ष आहे.
अनेक शिक्षकांनी या वर्षी नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास सुरू केला आहे. TET उत्तीर्ण केल्यानंतर शिक्षकांसाठी पुढील टप्पा म्हणजे TAT — Teacher Aptitude and Intelligence Test — ही परीक्षा आहे. राज्यातील मोठ्या प्रमाणातील आगामी शिक्षक भरती थेट या दोन परीक्षांच्या निकालावर अवलंबून आहे. TAT परीक्षा 8 फेब्रुवारीला होणार असून या परीक्षेसाठीही शिक्षकांनी तयारी सुरू केली आहे.
TET परीक्षा दोन वेगवेगळ्या स्तरांवर घेण्यात येणार आहे. पेपर 1 हा इयत्ता 1 ली ते 5 वी या गटातील शिक्षकांसाठी तर पेपर 2 हा इयत्ता 6 वी ते 8 वी या गटातील शिक्षकांसाठी असणार आहे. दोन्ही पेपर 150 गुणांचे असून परीक्षेत नकारात्मक गुणांकन नाही. खुल्या प्रवर्गासाठी किमान 60 टक्के आणि राखीव प्रवर्गासाठी 55 टक्के गुण मिळाल्यास उमेदवार पात्र समजला जाईल. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पात्रता प्रमाणपत्र दिले जाईल, ज्याची वैधता शिक्षक भरती प्रक्रियेत महत्वाची मानली जाते.
दोन्ही परीक्षांचे निकाल मिळूनच एकूण शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने उमेदवारांमध्ये उत्सुकता आणि तणाव दोन्ही निर्माण झाले आहेत. विद्यार्थ्यांची परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांनाच आता परीक्षेला बसावे लागणार असल्याने त्यांच्या ज्ञानाची, विश्लेषण क्षमतेची आणि निर्णय क्षमतेची खरी कसोटी लागणार आहे. या बदलामुळे शिक्षकांसमोर स्वतःचे कौशल्य सिद्ध करण्याचे महत्त्वाचे आव्हान उभे राहिले आहे.
राज्यातील शिक्षक संघटनांनी या निर्णयाचे मिश्र प्रतिसाद दिले आहेत. काही शिक्षक हा नियम शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे सांगत असताना, कार्यरत शिक्षकांना पुन्हा परीक्षा देण्याची सक्ती अनावश्यक असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे. तरीही पुढील भरतीचे भविष्य या परीक्षांवर अवलंबून असल्याने राज्यातील शिक्षकवर्ग या दोन्ही महत्त्वाच्या चाचण्यांसाठी सज्ज होत आहे.