राजनाथ सिंह नाशिक दौऱ्यावर; तेजस विमान वायुदलात दाखल, तिसऱ्या प्रोडक्शन लाईनचं उद्घाटन ओझरमध्ये
राजनाथ सिंह नाशिक दौऱ्यावर; तेजस विमान वायुदलात दाखल, तिसऱ्या प्रोडक्शन लाईनचं उद्घाटन ओझरमध्ये
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर असून, ओझरच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) येथे तेजस विमान वायुदलात दाखल करण्याचा आणि तिसऱ्या प्रोडक्शन लाईनच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
सायली मेमाणे
पुणे १६ ऑक्टोबर २०२५ : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर असून आज ते नाशिकमध्ये मुक्कामी राहणार आहेत. या दौऱ्यात उद्या सकाळी ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कारखान्यात तेजस लढाऊ विमान भारतीय वायुदलात दाखल करण्याचा सोहळा पार पडणार आहे. तसेच तेजस विमान निर्मितीच्या तिसऱ्या प्रोडक्शन लाईनचे उद्घाटन देखील राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे.
तेजस हे भारतात विकसित केलेले अत्याधुनिक लढाऊ विमान असून, देशाच्या आत्मनिर्भरतेचा आणि संरक्षण क्षमतेचा प्रतीक मानले जाते. या विमानाच्या सामावेशाने भारतीय वायुदलाची ताकद अधिक वाढणार आहे. ओझरमधील HAL कारखाना हे देशातील सर्वात महत्त्वाचे एरोस्पेस उत्पादन केंद्र असून, येथून विविध लढाऊ विमानांची निर्मिती केली जाते.
या कार्यक्रमासाठी भारतीय वायुदलाचे वरिष्ठ अधिकारी, HAL चे उच्चपदस्थ अधिकारी तसेच महाराष्ट्रातील प्रशासनातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तेजस विमान निर्मितीच्या तिसऱ्या प्रोडक्शन लाईनचे उद्घाटन झाल्याने विमान निर्मितीचा वेग वाढणार असून, स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारत एक मोठी झेप घेणार आहे.
राजनाथ सिंह यांच्या या नाशिक दौऱ्याला धोरणात्मक महत्त्व आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमांच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या निमित्ताने HAL च्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर HAL परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
तेजस विमानाच्या उत्पादन क्षमतेत वाढ झाल्यामुळे भारताची लढाऊ विमानांची निर्यात क्षमता देखील वाढेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या भारतीय वायुदलाच्या ताफ्यातील तेजस विमान अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून, त्यात नवनवीन सुधारणा सातत्याने केल्या जात आहेत. या विमानाचे सर्व घटक जवळजवळ पूर्णपणे भारतात तयार केले जात असल्याने ते ‘पूर्णपणे स्वदेशी’ विमान म्हणून ओळखले जाते.
राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमामुळे नाशिक हे पुन्हा एकदा देशाच्या संरक्षण इतिहासात महत्त्वाचे ठरणार आहे. HAL ओझरमधील या कार्यक्रमाद्वारे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील तांत्रिक सामर्थ्याचे आणखी एक उदाहरण साकार होणार आहे.