मुंबईतील पहिल्या थीम पार्कची दुरवस्था; निविदा प्रक्रियेतील विलंबामुळे उद्यानाचे काम रखडले
मुंबईतील पहिल्या थीम पार्कची दुरवस्था; निविदा प्रक्रियेतील विलंबामुळे उद्यानाचे काम रखडले
दादर–प्रभादेवीतील मुंबईचे पहिले थीम पार्क देखभालीअभावी उद्ध्वस्त. २६ कोटी खर्चून बांधलेले उद्यान पाण्याच्या टाक्यांच्या कामामुळे अर्धवट; निवडणुकीपूर्वी नूतनीकरण सुरू होण्याची अपेक्षा.
सायली मेमाणे
८ ऑक्टोबर २०२५ : मुंबईतील दादर आणि प्रभादेवी रेल्वे स्थानकांदरम्यान सेनापती बापट मार्गावर उभारलेले शहरातील पहिले थीम पार्क सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले हे उद्यान पर्यटकांसाठी आणि स्थानिक रहिवाशांसाठी एक आवडते आकर्षण होते. भारत आणि परदेशातून आणलेल्या तब्बल १७९ प्रजातींच्या वनस्पतींमुळे हे ठिकाण शहरातील एक अद्वितीय हरितक्षेत्र मानले जात होते. परंतु देखभालीअभावी आज उद्यानाची हिरवाई नष्ट झाली असून संपूर्ण परिसर ओसाड व उजाड झाल्याचे चित्र दिसत आहे.
या उद्यानाच्या अर्ध्या भागात २०२० पासून भूमिगत पाण्याच्या दोन मोठ्या टाक्यांचे बांधकाम सुरू झाले. पावसाचे पाणी साठवण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात आला असला, तरी या बांधकामामुळे उद्यानातील हिरवळ पूर्णपणे काढून टाकण्यात आली. आज या टाक्यांवर निरुपयोगी झुडपे, गवत आणि कचरा साठला आहे. त्यामुळे उद्यानाचा मोठा भाग वापरात नसल्याने ही जागा सोडून दिल्यासारखी वाटते. स्थानिकांच्या मते ही अवस्था अक्षरशः बघवत नाही.
सुमारे १० एकर जागेवर उभारलेले हे पार्क सुमारे २६ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आले होते. ब्रिटिशकालीन सीवरेज ऑपरेशन टँकच्या जागेवर तयार झालेले प्रमोद महाजन आर्ट पार्क हे शहरातील पहिल्या आधुनिक थीम पार्कपैकी एक होते. आर्किटेक्चर कमिटीचे तत्कालीन अध्यक्ष चंद्रकांत पुगावकर यांच्या पुढाकाराने हे उद्यान तयार झाले आणि त्याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. उद्यानात लेसर शो, पर्यावरणीय चित्रपटांसाठी खोल्या, मुलांसाठी खेळ व्यवस्था, आकर्षक शिल्पे आणि विशेष प्रकाशयोजना अशी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र बऱ्याच सुविधा आता निष्क्रिय झाल्या असून तांत्रिक उपकरणे बंद पडली आहेत.
स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, 2020 पासून टाक्यांच्या कामासाठी उद्यान बंद करण्यात आले होते. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा उद्यान दुरुस्त करून उघडण्याचे प्रशासनाचे आश्वासन होते; परंतु आजतागायत नूतनीकरणाचे काम सुरू झालेले नाही. निविदा प्रक्रियेत विलंब झाल्याने उद्यानाचे पुनर्विकासाचे काम पुढे ढकलले गेले आहे. पालिका उद्यान आणि वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या मते, नूतनीकरणाच्या निविदा अंतिम टप्प्यात आहेत आणि महापालिका निवडणुकीपूर्वी सुशोभीकरणाचे काम सुरू होईल.
उद्यानातील अनेक भागात प्रकाशयोजनांचा अभाव असल्याने संध्याकाळी येथे अंधार दाटून बसतो. त्यामुळे परिसरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होते. आनंद यादव, लालबहादूर शर्मा, जितेंद्र कनोजिया यांसारख्या स्थानिक नागरिकांच्या मते, उद्यानाची दुरवस्था पाहता हे ठिकाण पुन्हा सुरक्षित आणि आकर्षक बनवण्यासाठी तातडीने उपाययोजना आवश्यक आहेत. भूमिगत टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाले असले, तरी बाग, खेळाची जागा, पायवाटा आणि हरितक्षेत्रांचे काम सुरू व्हायला हवे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सुशोभीकरणाचे काम सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुंबईतील पहिले थीम पार्क पुन्हा एकदा नागरिकांसाठी खुले व्हावे आणि त्याचे मूळ सौंदर्य परत यावे, हीच सर्वांची इच्छा आहे.