अतुल तोडणकर यांचा पंढरपूर वारीचा विलक्षण अनुभव; ‘इतक्या गर्दीत विठ्ठलासमोर रडत होतो…’

अतुल तोडणकर यांचा पंढरपूर वारीचा विलक्षण अनुभव
मराठी अभिनेते अतुल तोडणकर यांनी कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला झालेल्या विठ्ठल दर्शनाचा विलक्षण अनुभव शेअर केला. पाहा त्यांनी नेमकं काय सांगितलं?
सायली मेमाणे
पुणे १ जुलै २०२५ : मराठी टेलिव्हिजन आणि रंगभूमीवर आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अभिनेते अतुल तोडणकर यांनी नुकताच एक अत्यंत भावनिक आणि आध्यात्मिक अनुभव शेअर केला आहे. त्यांनी पत्नीसमवेत कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि त्या अनुभवाने ते अत्यंत भावूक झाले.
अतुल तोडणकर यांनी ‘हंच’ मीडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाची आठवण सांगितली. ते म्हणाले की, “मी आणि पत्नी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला गेलो. खरंतर आम्हाला त्या दिवशी एकादशी आहे, याची कल्पनाच नव्हती. तिथे पोहोचल्यावर लोकांनी सांगितलं की आज सात-आठ लाखांची गर्दी आहे.” अशा प्रचंड गर्दीच्या वेळी मुखदर्शनही मिळणं कठीण असतं, हे जाणूनसुद्धा ते विठ्ठलाच्या मंदिरात पोहोचले.
तिथे एका माणसाच्या मदतीने त्यांना मुख्य मंदिरात नेण्यात आले. तेव्हा अतुल म्हणाले, “आम्हाला वाटलं मुखदर्शनच मिळेल, पण तो म्हणाला, ‘मुखदर्शन नाही, बघा समोर.’ आणि खरंच! विठ्ठलाची मूर्ती आमच्या समोर होती. इतक्या गर्दीत आम्ही त्या मूर्तीसमोर उभं राहिलो आणि नकळत डोळ्यातून अश्रू आले. त्या क्षणी जाणवलं की हे काहीतरी विलक्षण आहे.” त्या अनुभवाचे वर्णन करताना त्यांचे भाव ओसंडून वाहत होते.
या अनुभवामुळे अतुल तोडणकर यांच्यात अध्यात्मिक बदल घडून आला आहे, असं त्यांच्या पत्नीने सांगितलं. त्या म्हणाल्या, “त्या दिवसानंतर अतुल खूपच अध्यात्मिक झाला आहे. विठ्ठलाचं ते दर्शन आमच्या दोघांसाठी अविस्मरणीय ठरलं.”
पंढरपूर वारीचा अनुभव प्रत्येकासाठी खास असतो, पण कार्तिकी एकादशीच्या लाखो भक्तांच्या गर्दीत देखील विठ्ठलाचे साक्षात दर्शन घडणे आणि त्या क्षणी भावनांच्या भरात हरपून जाणं – हा अनुभव अतुल तोडणकर यांच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter