इंदिरानगरमध्ये मोबाईल हिसकावून चोरी करणाऱ्या टोळीला अटक; 2.9 लाखांचा मुद्देमाल जप्त
इंदिरानगर पोलीसांनी मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीला अटक केली
इंदिरानगर पोलीसांनी मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीला अटक केली; 3 आरोपी ताब्यात, ₹2.9 लाख किंमतीचा मोबाईल व रिक्षा जप्त.
नाशिक ३ जुलै २०२५ : इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल हिसकावून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे 2.9 लाख रुपये किमतीचा मोबाईल फोन व रिक्षा असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दिनांक 2 जून 2025 रोजी गुरू गोविंद कॉलेज परिसरात एका नागरिकाचा मोबाईल हिसकावून नेण्यात आला होता. सदर प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-2) श्रीमती मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला तपासाची जबाबदारी देण्यात आली होती.
पोलिस अंमलदार सागर कोळी यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, संबंधित आरोपी पाथर्डीगाव परिसरातील एमएसईबी ऑफिस परिसरात एका रिक्षातून संशयास्पदरीत्या फिरत आहेत. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे, पो.ना. पवन परदेशी, पो.अं. सागर कोळी, अमोल कोथमीरे, प्रमोद कासुदे आणि जयलाल राठोड यांच्या पथकाने तत्काळ सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.
तपासादरम्यान अटक करण्यात आलेले आरोपी – शोएब सादिक शेख (वय 22, रा. खडकाळी), नवीद मुक्तार शेख (वय 22, रा. रसुलबाग कब्रस्तान, खडकाळी), आणि आसिफ हुसेन शेख (वय 19, रा. वडाळा-पाथर्डीरोड) यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी इंदिरानगर हद्दीत आणि नाशिक शहरातील विविध भागात मोबाईल हिसकावून चोरी केल्याचे सांगितले.
त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण ₹2,90,000 किमतीचे मोबाईल फोन्स आणि वापरलेली रिक्षा हस्तगत केली. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(4), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त, उपआयुक्त व सहाय्यक आयुक्तांच्या सूचनांनुसार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.
पोलिसांच्या या जलद आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे इंदिरानगर परिसरात नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास वाढला आहे.